गेल्या वर्षभरात लाचखोरीच्या प्रमाणात २१ टक्क्यांनी वाढ;१०७६ लाचखोरांवर गुन्हे दाखल
पुणे ।
राज्यात कोरोना महामारीच्या काळातही लाचखोरांची गाडी सुसाट असून गेल्या वर्षभरात लाचखोरीच्या प्रमाणात तब्बल २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. लाचखोरीत पुणे विभाग अव्वलस्थानी आहे.राज्यात महसूल विभागापाठोपाठ पोलीस लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसते. गेल्या वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७६४ यशस्वी सापळे रचले असून १०७६ लाचखोरांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये महसूल विभाग पहिल्या स्थानावर आहे.पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर पोलीस तर लाचखोरीत तिसऱ्या स्थानावर पंचायत समितीचे कर्मचारी आहेत.
प्रत्येक शासकीय विभागात लाच दिल्याशिवाय काम होत नाही,ही वसुस्थिती आहे.राज्यात पोलीस विभागावर १७३ सापळा कारवाई करीत २५५ पोलिस कर्मचाऱ्यांना अटक केली. तर महसूल, भूमिअभिलेख आणि नोंदणी विभागातील १७८ लाच प्रकरणात २५२ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच पंचायत समितीच्या ५७ सापळ्यात ७८ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. पोलिस व महसूल खात्यात सर्वाधिक लाच स्वीकारण्याची प्रकरणे झपाट्याने समोर येत आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात काही विभाग वगळता इतर सर्व विभागात लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
विविध विभागांमधील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या काळात सुमारे २ कोटी ६४ लाख १९ हजार ८८१ रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या १ जानेवारीपासून ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लाच स्वीकारण्याच्या प्रकरणांमध्ये ७६४ सापळे लावण्यात आले होते. त्यात १०७६ अधिकारी आणि कर्मचारी अडकले. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक,नागपूर,अमरावती,औरंगाबाद आणि नांदेड असे आठ विभाग आहेत. विविध सरकारी विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबी शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करत असते. राज्यात गेल्या सन २०१२ ते २०२१ या १० वर्षांत लाचखोरीची ८ हजार ५६२ प्रकरणे आढळून आली आहेत. लहानलहान कामांत अडवणूक करून लाच मागणारे अधिकारी आणि कर्मचारी खुलेआम फिरत असतात.आता या कर्मचाऱ्यांच्या विरोधातही एसीबीकडे तक्रार करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
गेल्या चार वर्षभरात महापालिकांमध्ये लाचेची ५१ प्रकरणे निदर्शनास आली. यात ७७ अधिकारी आणि कर्मचारी अडकले.यात लाचखोरांनी ७० लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.ती इतर सर्व विभागांपेक्षा सर्वाधिक आहे.महावितरण कंपनीतही ५१ प्रकरणांमध्ये ६८ भ्रष्ट कर्मचारी एसीबीच्या हाती लागले आहेत. या लोकांनी ४ लाख ४४ हजार रुपयांची लाच मागितली होती.गेल्या तीन ते वर्षांत तक्रारकर्त्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.
विभागांचा विचार केल्यास,पुणे विभागात सर्वाधिक लाचेची १६५ प्रकरणे निदर्शनास आली असून २३५ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले असून,औरंगाबाद विभागात लाचेची १३० प्रकरणे निदर्शनास आली असून१८४ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत,औरंगाबाद विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ नाशिक विभागात लाचेची १२९ प्रकरणे निदर्शनास आली असून १७३ तर नागपूर विभागात लाचेची ७२ प्रकरणे निदर्शनास आली असून ९४ आरोपी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालानुसार, कोरोनाच्या महामारीतही लाचखोर मात्र सुसाट असल्याचे दिसून आले.
लाचखोरांची विभागवार आकडेवारी अशी :
विभाग सापळा आरोपी
मुंबई ४६ ६६
ठाणे ८८ १३५
पुणे १६५ २३५
नाशिक १२९ १७३
नागपूर ७२ ९४
अमरावती ७२ १०३
औरंगाबाद १३० १८४
नांदेड ६२ ८६
हेही वाचा…
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !