सेंद्रीय खत भेसळीचा मोठा फटका शेतकरी वर्गाला : खतांच्या रासायनिक पृथ:करणाची गरज
कृषी विभागाने फक्त चौकशीचा फार्स न करता या गोष्टींकडे गांभीर्याने बघण्याची गरज
पुणे |
अलीकडच्या काळात सेंद्रीय शेती काळाची गरज बनली आहे.शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळू लागला आहे.याचाच फायदा काही सेंद्रीय खत निर्मिती करणार्या कंपन्यांकडून उठवला जात असून मोठयाप्रमाणात खतात भेसळ केली जात असल्याची चर्चा आहे.यातून कोटयावधी रुपयांची उलाढाल होत आहे.याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे.याला अनेक कंपन्या अपवाद आहेत.काही नामांकित कंपन्यांकडून मात्र दर्जेदार खत विक्री सुरु आहे.रासायनिक खतांतील घटकांचा गुणात्मक व संख्यात्मक दर्जाचे रासायनिक पृथ:करण होणे गरजेचे आहे.कृषी विभागाने फक्त चौकशीचा फार्स न करता या गोष्टींकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.
शेतीमध्ये सेंद्रीय शेती ही संकल्पना चांगल्या प्रकारे रूजू होवू लागली आहे.सेंद्रीय शेतीतील उत्पादनांना बाजारात चांगला दर मिळत आहे.सेंद्रीय उत्पादने खरेदी करणारा वेगळा ग्राहक वर्ग निर्माण झाला आहे.या उत्पादनांना जादा पैसे द्यायलाही हा वर्ग एका पायावर तयार आहे.सेंद्रीय शेतीचे फायदे आज सर्वांना कळू लागले आहेत.शेतकरी मोठया प्रमाणात तिकडे वळू लागला आहे.
सेंद्रीय शेतीचे वाढते क्षेत्र लक्षात घेवून नवनविन कंपन्या मार्केटमध्ये आल्या आहेत.या कंपन्यांनी कमिशनवरती एजंट नेमले असून एजंट शेतकर्यांच्या बांधापर्यंत जावून उत्पादने घेण्याची गळ घालत असल्याचे चित्र शिवारात पाहायला मिळते.वेगवेगळया कंपनींची सेंद्रीय खते बाजारात आहेत.बहूतांश कंपनींच्या खताच्या गोणीवरती एन.(नत्र),पी.(स्फुरद),के(पालाश) यांचे प्रमाण दिलेले नसते.दिले असेल तर तेवढया प्रमाणात त्या खतांमध्ये घटक आहेत का हा खरा प्रश्न उपस्थित होतो.
सेंद्रीय खतांच्या 50 किलो गोणीची किंमत साधारण 300 ते 400 रूपयांच्या आसपास आहे.एवढी किंमत देवूनही त्या दर्जाचे खत शेतकर्यांना मिळते की नाही हा संशोधनाचाच विषय आहे.निर्मिती केलेल्या सेंद्रीय खतांच्या गोणीमध्ये मॉयश्चर हे मोठयाप्रमाणात असते.तर कार्बन कर्दचे प्रमाणाचा त्यावरती अल्लेख केलेला असतो.कालावधी वाढेल तसा त्यामधील कार्बनकर्दच्या प्रमाणाबरोबरच वजनही कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.सेंद्रीय खतांमध्ये प्रामख्याने जैविक पदार्थांचे विघटन केले जाते.सेंद्रीय खतांमध्ये लिंबोळी,करंजी,कुजलेला पाला,जीवाणू कल्चर आदींचा वापर केला जातो.सेंद्रीय खते ही काळी,माती सारखी दिसणारी असल्याने यामध्ये भेसळ करायला कंपन्यांना भरपुर वाव राहतो.काही कंपन्या भेसळ करत असल्याची चर्चा आहे.
सेंद्रीय खतांमध्ये वजन वाढवण्यासाठी सेंद्रीय खतांच्या डेपोवर मोठया प्रमाणात पाणी मारले जाते.सेंद्रीय खतांची प्रकीया वेळखाउ असल्याने त्याचवेळी कंपन्यांकडे मागणी वाढल्यास मोठया प्रमाणात काळी माती मिसळली जात असल्याची चर्चा आहे. सेंद्रीय खत तयार होण्यासाठी कालावधी लागतो तेवढा कालावधी कंपनीकडून घेतला जात नाही त्याचा परिणाम सेंद्रीय खतांच्या गुणवत्तेवर होतो.याचा फटका शेतकर्यांना बसत असून पैसे मोजूनही त्यांना योग्य दर्जाचे सेंद्रीय खत मिळत नाही. सेंद्रीय खत निर्मिती करणार्या कंपन्यांनी फवारणीची खते, औषधे यांचे उत्पादनही बाजारात आणली आहेत. एजंटाकडून तालुक्यातील औषधांचे वितरण केले जाते. या फवारणींच्या औषधाबरोबर वेगवेगळया स्किम राबवून शेतकर्यांना आकर्षित केले जात आहे.
या फवारणींच्या खतांचा,औषधांचा दर्जा वारंवार तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या औषधामधील घटकांची टक्केवारी उत्पादनाच्या पॅकिंगवरती लिहणे बंधनकारक करणे गरजेचे आहे.तरच काही प्रमाणात भेसळीवरती प्रतिबंध येणार आहेत. राज्यात मोठयाप्रमाणात दुय्यम अन्नघटक निर्मिती करणार्या कंपन्या झाल्या आहेत.कंपन्याकडून रासायनिक खत विक्रेत्यांना जास्त मार्जिन देवून विक्रेत्यांना आकर्षित करत आहेत.
काही विक्रेतेही जास्त फायद्यासाठी लिंकींगच्या नावाखालीही उत्पादने शेतकर्यांच्या माथी मारत आहेत.गोणीवरती दिलेले दुय्यम अन्नद्रव्यांचे प्रमाणाची गुणवत्ते बाबत प्रश्नचिन्ह आहे.रासायनिक खतांमध्ये एन.पी.के खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. युरिया खतांचा अन्य कारणासाठी वाढलेला वापर लक्षात घेवून कंपन्यासाठी सरकारने निम तेलांचा वापर करणे बंधनकारक केले आहे.यामुळे युरियाच्या गैरवापराला लगाम बसला आहे.काही कंपन्यांच्या मिश्रखतांमध्ये विटाचे तुकडे,वाळूमिश्रीत खडे आढळून आले होते.याबाबत कोठे दाद मागायची असा प्रश्न शेतकर्यांना पडत आहे.रासायनिक खतांच्या गोणीवरती असणार्या घटकांचे रासायनिक पृथ:करण होणे गरजेचे आहे.
हेही वाचा…
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा