सर्वत्र चर्चेला असलेले गांडूळ खत म्हणजे काय आणि ते कसे करावे हे महत्त्वाचे आहे. गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड तयार करण्याचा सल्ला दिला जात असतो. ज्यांच्याकडे शेड घालण्यासाठी खर्च करण्याची ऐपत असेल त्यांनी पत्र्याचे किंवा तसले मजबूत शेड तयार करायला काही हरकत नाही. परंतु गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड आवश्यक नाही. गांडुळाला उन्हापासून त्रास होतो म्हणून त्याला सावली पाहिजे आहे. ती छपराने सुद्धा देता येते. साधे कुडाचे शेड जरी केले तरी गांडूळ खत तयार करण्यात काही अडचण येत नाही. या छपराखाली आपल्या गरजेनुसार एक मोठा गादी वाफा करावा आणि त्यात गांडूळ सोडून द्यावेत. या गांडुळांना खायला काही तरी देत रहावे. म्हणजे त्या वाफ्यावरच त्या खाल्लेल्या वस्तूपासून ती गांडुळे खत तयार करत राहतील. हेच गांडूळ खत होय. या वाफ्यावर पाचट किंवा गव्हाचे काड असे आच्छादन टाकावे. म्हणजे गांडुळाला उन्हापासून आणखी संरक्षण मिळेल. या वाफ्यावरच्या गांडुळाला खायला काय दिले पाहिजे ? आपल्या शेतातल्या खताच्या खड्ड्यातील 70 टक्के पर्यंत कुजलेला कचरा त्याला दिला तरी चालतो. किंवा त्याला खायला सोपा जाईल असा हलका सेंद्रीय कचरा दिला तरी ते तो कचरा खाऊ शकते.
एक गांडूळ वर्षाला साधारणत: 4 हजार पिली तयार करते
आपल्या शेतामध्ये खुल्या जमिनीत सुद्धा गांडूळ असतातच आणि ते शेतातले खत, कचरा सारे काही खाऊन त्याची विष्ठा शेतात टाकत असतातच. परंतु शेतातली ओल कायम टिकत नसते. जस जशी जमिनीची ओल कमी होत जाईल तस तशी गांडुळांची संख्या घटायला लागते. मोठ्या प्रमाणावर गांडूळ मरतात. गांडूळ साधारणपणे सात फूट खोलीपर्यंत जाऊन राहतात. परंतु त्याही खोलीपर्यंत ओल टिकली नसेल तर गांडूळ मरून जातात. त्यामुळे शेताच्या ऐवजी असा विशेष वाफा तयार करून तिथे खत तयार केले म्हणजे खत तयार करण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहते. या वाफ्यामध्ये आपण आवश्यक तेवढी ओल टिकवू शकतो. एकदा अशा वाफ्यात थोडी गांडुळे सोडली तरी काही दिवसात त्यांची संख्या प्रचंड वाढते. एक गांडूळ वर्षाला साधारणत: 4 हजार पिली तयार करते. त्यातली काही मेली तरीही ही संख्या प्रचंड आहे. तेव्हा एकदा गांडूळ खत तयार करायला सुरुवात केली की, त्यांना भरपूर खाद्य देता आले पाहिजे. खाल्लेल्या वस्तूचे खत तयार करण्याची त्याची क्षमता अफलातून असते.
गांडुळाच्या वजनाच्या 90 टक्के एवढी खतवड माती त्याच्या पोटातून बाहेर
एका पूर्ण वाढलेल्या गांडुळाचे वजन 10 ग्रॅम असते आणि ते आपल्या वजनाएवढी माती खात असते. त्या मातीतला दहा टक्के अंश त्याला अन्न म्हणून उपयोगी पडतो मात्र बाकीचा 90 टक्के मातीचा अंश ते अन्नाचे पचन करणारा एक घटक म्हणून ते पोटात घेत असते. या पचनाच्या प्रक्रियेत मातीवर काही संस्कार होतात आणि एका गांडुळाच्या वजनाच्या 90 टक्के एवढी खतवड माती त्याच्या पोटातून बाहेर पडते. या प्रक्रियेमध्ये मातीचे रुपांतर खतवड मातीत होते. एका एकरामध्ये साधारण एक लाख गांडुळे असतील तर त्यांच्या पचनाच्या प्रक्रियेतून 120 टन खतवड माती निर्माण होत असते. हा झाला शेतातला हिशोब. परंतु आपल्या गादी वाफ्यावर म्हणजेच गांडूळ खत तयार करण्याच्या युनिटमध्ये दहा-बारा हजार तरी गांडुळे तयार होऊ शकतात. त्यांच्या वजनाच्या दहा टक्के एवढे अन्न आपण त्यांना पुरवले तर या गादी वाफ्यावर 12 टन खतवड माती वर्षाला तयार होते. दर तीन-चार महिन्यांनी या गांडूळ निर्मिती प्रकल्पातील माती चाळून काढावी. त्यासाठी वाळूची चाळणी वापरली जाते. चाळणीतून खाली पडलेली माती म्हणजेच गांडूळ खत. ही माती गांडूळ खत म्हणून विकली जाते. ती शेतात टाकली जाते. या चाळणीत वर राहिलेली गांडुळे पुन्हा गादी वाफ्यावर सोडावीत. खाली राहिलेली माती म्हणजे गांडूळ खत चाळून काढल्याबरोबर शेतात टाकावे. त्यात गांडूळाची अंडी असतात आणि ती मरण्याच्या आत हे खत शेतात टाकले की, शेतामध्ये गांडुळाची वाढ व्हायला मदत होते. सेंद्रीय शेतीचा आता बर्यापैकी प्रचार झालेला आहे. शेतकर्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटायला लागले आहे आणि सेंद्रीय खते, तणनाशके, संजीवके, जैविक पीकनाशके यांचा वापर सुद्धा वाढत चालला आहे. या सार्या गोष्टींचा विचार करून काही धंदेवाईक लोकांनी सेंद्रीय खते तयार करून ती विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे आणि बरेच शेतकरी ती खते विकत घ्यायला लागले आहेत.
सेंद्रीय शेती हा शेतीतले उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रभावी इलाज
काही शेतकरी गांडूळ खत कोठे विकत मिळते याच्या शोधात भटकायला लागले आहेत तर काही शेतकरी गांडूळ कोठे विकत मिळतात, याची चौकशी करत ङ्गिरायला लागले आहेत. सेंद्रीय शेतीचा आग्रह ज्या गोष्टींसाठी धरला जातो त्या गोष्टींचा विचार केला तर ही सारी भटकंती, ही सारी चौकशी आणि सेंद्रीय खतांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार हे हास्यास्पद वाटायला लागतात. यामध्ये सेंद्रीय शेतीचा मूळ आत्माच गमावला आहे असे वाटते. मुळात सर्व शेतकर्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, सेंद्रीय शेती हा शेतीतले उत्पादन खर्च कमी करण्याचा एक प्रभावी इलाज आहे. ही खते शेतात वाया जाणार्या काडी-कचर्यापासून आणि शेणा-मुतापासून तयार केलेली असावीत असे गृहित धरलेले आहे. आपल्या शेतातला काडी-कचरा वाया घालवून आपण लोकांच्या काडी-कचर्याचे तयार केलेले सेंद्रीय खत वापरत असू तर आपले उत्पादन खर्च वाढणार आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे सेंद्रीय खत हे आपण आपल्या शेतात स्वत:च तयार केलेले असले पाहिजे. एवढेच नव्हे तर ते सेंद्रीय खत कमीत कमी खर्चात कसे तयार होईल याबाबतही शेतकर्यांनी दक्ष असले पाहिजे.
केरळाच्या इडुकी जिल्ह्यामध्ये मानकुलम या गावात सेंद्रीय शेतीची चळवळच सुरू झाली आहे. त्यातूनच या गावातल्या शेतकर्यांनी मानकुलम हे सेंद्रीय शेती ग्राम म्हणून ओळखले जावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत वर्षभरात या गावातला प्रत्येक शेतकरी सेंद्रीय शेती करणाराच असेल असे त्यांनी ठरवले आहे. आता केरळमधील केरळ कृषी विकास समाज या नावाच्या एका स्वयंसेवी संघटनेच्या मदतीने गाव सेंद्रीय शेतीमय करण्याचा निर्णय गावकर्यांनी घेतला आहे. या स्वयंसेवी संघटनेने 32 खेड्यांमध्ये सेंद्रीय शेतीचे प्रयोग केले असून 2 हजार 200 शेतकर्यांना पूर्णपणे सेंद्रीय शेतकरी म्हणून जाहीर केलेले आहे. परंतु पूर्ण गावच सेंद्रीय शेतीमय करण्याचा प्रयोग मात्र मानकुलममध्ये केला जात आहे. मानकुलममध्ये 4000 शेतकरी आहेत. त्यातल्या 1000 शेतकर्यांनी गतवर्षी सेंद्रीय शेतीचा अवलंब सुरू केला आहे. टप्प्याटप्प्याने सर्व शेतकरी सेंद्रीय शेती करायला लागतील. या गावामध्ये कॉफी, चहा, लवंग, जिरे, विविध प्रकारची फळे, भाज्या ही पिके प्रामुख्याने घेतली जातात आणि प्रामुख्याने याच पिकांना सेंद्रीय खते देण्यावर भर दिला जात आहे. यासाठी शेतकर्यांना एकत्रित करणे, त्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देणे, त्यांना या पद्धतीच्या शेतीचे प्रशिक्षण देणे इत्यादी उपक्रम सतत राबवले जातात. त्यासाठी केरळा कृषी विकास समाज या संघटनेचे सचिव के.एन. जोस हे सातत्याने प्रयत्न करत असतात. या गावामध्ये तयार होणार्या सेंद्रीय मालाच्या विक्रीची व्यवस्था सुद्धा ही संघटनाच करणार आहे आणि सेंद्रीय मालाचे विक्री केंद्र असे फलक लावून मोठ्या शहरांमध्ये स्वतंत्र स्टॉल उभे करून या मालाची विक्री केली जाणार आहे. मानकुलम गावाच्या जवळ असलेल्या थोंडुपुळा या गावातील सेंद्रीय मालाचे असे एक विक्री केंद्र तिरुवनंतपूरम या गावात उभारण्यात सुद्धा आलेला आहे.
गांडूळाचे फायदे :
सेंद्रिय पदार्थाचे विघटन
सेंद्रिय पदार्थाचे जमिनीतील वितरण.
गवत व झाडांच्या पानांचा थर साठून झालेली घटट चटई गांडुळ फोडून काढ्तात.
जमिनीतील जीवाणूंची कार्यक्षमता वाढते .
सेंद्रिय पदा्र्थापासून पीकांचे अन्नद्रव्य पीकांना उपलब्ध करतात .
जमिनीच्या कणांची कणीदार संरचना करण्यास गांडुळ मदत करतात.
जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
गांडूळाच्या बिळांमुळे झाडांच्या मुळ्या खोल वाढतात, पाणी लवकर मुरते व हवा खेळती राहते.
पाण्याचा निचरा चागंला होतो.
पिकांचे व गवताचे उत्पादन वाढते.
जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
गांडूळ पाणी
गांडूळाच्या शरीरातून पाझरणा-या सिलोमिक फ्युइडला व मुत्राला गांडूळपाणी अथवा वर्मी असे म्हणतात.गांडूळखत करतांनासुध्दा आपण गांडूळ पाणी काढू शकतो.
गांडूळपाणी तयार करण्याच्या पध्दती :
एकात एक जाणारी दोन भांडी घ्यावी. आतील भांड्याच्या तळाजवळ एका बाजूने तोटीची सोय केलेली असावी. आतील 12 ते 16 लिटरच्या भांड्यात शेण मिश्नीत अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ भरावे. त्यामध्ये 1 ते 2 किलोग्रॅम गांडूळे सोडावी. सेंद्रिय पदार्थ जलद कुजण्यासाठी पुरेसे पाणी या पदार्थावर फवारावे. गांडूळे जसजशी सेंद्रिय पदार्थाचे सेवन करतात तसतसे त्याचे गांडूळ खतात रुपांतर होते. या गांडूळखतावर थोडे अधिक पाणी काही कालांतराने फवारावे, त्यामुळे आतील भांड्यामधून बाहेरच्या भांड्यात जाडसर रंगीत द्रव तोटीद्वारे बाहेर पडून बाहेराच्या भांड्यात साचतो. हा द्रव रबरी तोटीने ओढून बाटलीत गोळा केला जाती यालाच गांडूळ पाणी असे म्हणतात.गांडूळ पाणी तयार करण्यासाठी चांगली पूर्ण वाढलेली 1 कि.ग्रँ वजनाची गांडूळ गोळा करावीत. त्याची कात बाजूला वेगळी करावी.नंतर 15 ते 20 मिनीट त्यांना एका प्लास्टिकच्या पसरट भांड्यात ठेवून त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे टाकाऊ सेंद्रिय पदार्थ वेगळे करून गांडूळे स्वच्छ करुन घ्यावीत. नंतर प्लास्टिकच्या भांड्यात 500 मिली कोमट पाणी घेऊन ही गांडूळे 3 मिनीट या पाण्यात सोडून ती चांगली ढवळून घ्यावीत, नंतर दुस-या भांड्यात 500 मि.ली. थंड पाणी घेऊन त्यामध्ये दोन मिनीट ढवळून घ्यावीत. ही गांडूळे पुन्हा गांडूळ खत निर्मितीसाठी वापरता येतात. आता दोन्ही भांड्यातील द्रावण एकत्र मिसळून पिकांवर फवारण्यासाठी वापरावे.