महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
मुंबई : महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका 5639 व मदतनीस 13243 अशी एकूण 18 हजार 882 पदे भरण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. राज्य शासन 75 हजार पदभरती करणार आहे यापैकी 18 हजार पेक्षा जास्त पदभरती महिला व बाल विकास विभाग करीत असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
१४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत मुख्यसेविका या पदाची सरळसेवा व निवडीद्वारे ३७४ पदभरतीची परिक्षा होणार आहे.
मंत्रालयात महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ व अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तसेच, भिवंडी शहरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत, कर्मचारी व अधिकारी यांच्या पदभरती संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व कामांचा आणि पदभरतीसंदर्भात आढावा घेतला.
महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, मुख्यसेविका यांची सरळसेवेने 102 म्हणजे 80 टक्के पदे, तर निवडीद्वारे 272 म्हणजेच 100 टक्के पदे भरावयाची आहेत. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत होणाऱ्या या परिक्षा पारदर्शक वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील एकूण 553 बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एक लाख 10 हजार 591 अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून, 5639 अंगणवाडी सेविका व 13243 अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.
याचबरोबर राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.
महिला बचतगटांचे आदर्श कम्युनिटी किचन
महिला बचत गटांनी एकत्रितरित्या पोषण आहाराकरिता आदर्श कम्युनिटी किचन करावे, यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल. अंगणवाडी आहार पुरवठ्याच्या कामासाठी एका संस्थेला पाच अंगणवाड्या दिल्या जातात. लाभार्थी महिला विकास संस्थेच्या कामाच्या अहवालानंतर अंगणवाड्यांची संख्या वाढविणे अथवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
भिवंडी निजामपूर महानगरपालिका हद्दीतील लोकसंख्या वाढीनुसार अंगणवाडी संख्या वाढविण्याबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. एकूण 341 केंद्रे असून लोकसंख्येनुसार 102 अतिरिक्त अंगणवाड्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक नगरपालिकेत महिला बाल विकास विभागाचा अधिकारी असावा, तसेच अंगणवाड्या शाळेतील रिकाम्या वर्गखोल्यात सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाशी समन्वय साधावा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावेत. प्रत्येक गरजू महिला व बालकांना पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी मंत्री तटकरे यांनी दिले.
यावेळी आमदार प्रवीण दरेकर, रईस शेख, सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, बचत गटाच्या विभागीय अध्यक्ष जयश्री पांचाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
Recent Posts
बातमी शेअर करा : जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांची माहिती सांगली : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन 2024-25 या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्याती... Read more