Last Updated on 09 May 2025 4:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । बारामती येथील कृषि विज्ञान केंद्राच्या मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर करून केलेली ऊस शेती पाहून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यातील प्रगतशील शेतकरी प्रभावित झाले. बारामती येथील ऍग्रीकल्चरल डेव्हल्पमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्राने एआयचा वापर करून केलेली ऊस शेती पहाणे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या वतीने आयोजित ऊस शेतीमध्ये एआयचा वापर कसा करायचा? या विषयावरील चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ‘राजारामबापू’चे ३५ प्रगतशील शेतकरी आणि संबंधित अधिकारी गेले होते. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या प्रोत्साहनाने या अभ्यास दौऱ्याचे नियोजन केले होते.
राष्ट्रीय नेते व व्हीएसआयचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार,व्हीएसआयच्या एआय टास्क फोर्सचे अध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांनी राज्यातील साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.विवेक भोईटे यांनी शेतकऱ्यांना अद्यावत माहिती दिली,तसेच यावेळी ऊस शेतीच्या प्लॉटची पाहणी करण्यात आली.
कामेरीचे सरपंच रणजित पाटील,सचिन पाटील इस्लामपूर, अमर पाटील येडेनिपाणी, वैभव हाके, अजित हाके कारंदवाडी, सुलोचना कदम कुंडलवाडी, मोहन पाटील कासेगाव, रामभाऊ माळी धोत्रेवाडी, निलेश पवार रेठरेहरणाक्ष, महादेव गावडे बोरगाव, शिवाजी माने साखराळे, चंद्रकांत जाधव क.डिग्रज, कुबेर खुळे क.पिरान यांच्यासह ३० प्रगतशील शेतकरी,तसेच जलसिंचन अधिकारी जे.बी.पाटील, गटाधिकारी संग्राम पाटील, विकास कदम या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.
एआयचा ऊस शेतीमध्ये वापर ही काळाची गरज आहे. या अद्यावत तंत्रज्ञानाने ऊसाचे एकरी उत्पादन निश्चित वाढणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात एआयचा वापर करण्यासाठी आग्रही रहायला हवे, अशी भावना अभ्यास दौऱ्यात सहभागी शेतकऱ्यां नी प्रतिक्रिया दिल्या.











































































