सांगली । राजू शेट्टी यांनी आज मुंबई येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.उद्धव ठाकरेंशी भेट राजकीय नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी घेतली असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
राजू शेट्टींच्या उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर राजू शेट्टी महाविकास आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.यानंतर राजू शेट्टी यांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले आहे. उद्धव ठाकरेंना राजकीय हेतूने भेटलो नाही. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणून भेटलो होतो, असे राजू शेट्टींनी म्हंटले आहे.
राजू शेट्टी म्हणाले,एक तर केंद्र सरकारने अदानींवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावर पाच टक्के आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीनला भाव नाही. 2000 साली असलेला भाव चार हजार होता. 24 वर्षानंतर तो आताही तेवढाच आहे याचं कारण मोठ्या प्रमाणात कच्चं तेल जे बाहेरच्या देशातून आयात झाला आहे त्याच्यावरील आयात शुल्क 2025 पर्यंत पाच टक्के कमी केल्यामुळे परिणाम झाला आहे.
सोयाबीनच्या प्रश्नावर,कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये दौरा सुरू करणार आहे आणि त्यासाठी अदानींविरोधात उद्धव ठाकरे यांची जी लढाई आहे ती शेतकऱ्यांची सुद्धा लढाई आहे.शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळावा म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्यासोबत राहू असल्याचे आश्वासन उध्दव ठाकरेंनी आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडी निवडणुकीत तुम्हाला पाठिंबा देईल का? या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले, “मला मविआशी काही देणेघेणे नाही. मी हे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मविआच्या माध्यमातून विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादीने कारखानदारांना पुरक असे एफआरपीचे तुकडे करणे किंवा भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड करून रस्त्याला जमीन गेल्यानंतर शेतकऱ्यांना जो चार आणि पाच पट मोबदला मिळत होता. यात 60 टक्काने कमी करण्याची दुरुस्ती महाविकास आघाडीचे सरकार असताना केली आहे. हे आमचे आक्षेपाचे मुद्दे आहेत. त्यामुळे आम्ही मविआ सोडलेली आहे. त्यामुद्द्यावर मविआकडून जोपर्यंत स्पष्टीकरण मिळणार नाही. तोपर्यंत मविआपर्यंत जाण्याचा प्रश्नच येत नाही.”
दरम्यान,या बैठकीमध्ये खासदार संजय राऊत ,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मा.बांधकाम व आरोग्य सभापती सावकार मादनाईक यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.