आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतुचे आगमन होतेे.अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रास शारदीय नवरात्र किंवा देवी नवरात्र असे म्हणतात.नवरात्र नऊ किंवा दहा दिवसाचे असते.नवरात्रातील देवीची पूजा म्हणजे खरी शक्ती देवतेची पूजा होय.देवी नवरात्रामध्ये अखंड नंदा दीप म्हणजे तमसो मा ज्योतिर्गमय।…अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव !
घटस्थापना अर्थात वरूण,वेदिका स्थापना होय वरुण म्हणजे पाणी आणि वेदिकामध्ये शेती.शेतात सुपाने घातले तर खंडीने उगवते.पाणी म्हणजे माणसाचे जीवन पाणी आणि शेती याचे ऋण व्यक्त करणारा उत्सव.
उपोषन परान्न सेवनमुळे शरीरावर अतिरिक्त वाढणारी चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होते असे आयुर्वेद सांगते.मालाबंधन,कुमारी पूजा हा महत्त्वाचा विधी असतो.
जमल्यास दररोज एक याप्रमाणे नऊ दिवशी नऊ कुमारिकांची पूजा करावी.न जमल्यास निदान एक दिवस किमान एका कुमारिकेची पूजा अवश्य करावी.दोन ते दहा वर्षापर्यंतच्या मुलीस कुमारी अशी संज्ञा आहे.वयानुसार त्यांना विविध नावे आहेत.ती नावे पुढीलप्रमाणे दोन वर्षाची कुमारी,तीन वर्षाची त्रिमूर्ती,चार वर्षाची कल्याणी,पाच वर्षाची रोहिणी,सहा वर्षाची कालिका सात वर्षाची चंडिका,आठ वर्षाची शांभवी,नऊ वर्षाची दुर्गा,दहा वर्षाची सुभद्रा.
मंत्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रूप धारणीम् ।नवदुर्गात्मिका साक्षात् कन्यां आवाहयाहम् ॥
या मंत्राने कुमारिकेच्या मस्तकावर अक्षता वाहून आव्हान करावे.नंतर तिच्या वयाच्या अनुसरून वरीलपैकी योग्य नाव निवडून त्यांच्या पूजा मंत्रांनी त्या नावाच्या चतुर्थी विभक्यन्त यांचे नावाने तिची सोडशोपचार पूजा करावी.
त्याचे नाममंत्र पुढील प्रमाणे – कुमार्ये नमः त्रिमूर्त्यै नमः कल्याण्यै नमः रोहिण्यै नमः कालिकायै नमः चंडिकायै नमः शाम्भव्यै नमः दुर्गायै नमः सुभद्रायै नमः
कुमारी पूजेने या व्रत्ताने आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला मानाचे स्थान तिच्या बालपणापासूनच दिल्याचे दिसते.
कुमारी पूजेप्रमाणे श्री दुर्गा सप्तशती किंवा सौंदर्य लहरीचा पाठ करणे हेही नवरात्राचे एक महत्त्वाचे अंग.
पंचमीस ललिता पूजन.
षष्ठी ते नवमीपर्यंत अनुक्रमे सरस्वती आवाहन,सरस्वती पूजन,सरस्वती बलिदान आणि सरस्वती विसर्जन असे चार विधी असतात.हल्ली हे विधी विस्तार पूर्वक न करता संक्षेप स्वरूपात करतात.या काळात घरातील पोत्या व धार्मिक पुस्तकांची चार दिवस पूजा करतात.या काळात अध्ययन करीत नाहीत.यानिमित्ताने हे व्रत्त वाचन संस्कृती जपण्याचे काम करते असे मला वाटते.
अष्टमीच्या दिवशी देव्हाऱ्यात कडाकणी बांधल्या जातात.त्याच बरोबर अष्टमीस रात्री घागरी फुंकणे हा महत्त्वाचा विधी असतो.
अर्थात मातीचा घट एक पंचभौतिक मानवी देहाचे प्रतीक असून त्यात श्वास भरणे हे जिवात्म्याचे प्रतिक आहे.हा एक सामूहिक सम्मोहनाचाच प्रकार म्हणता येईल .
बऱ्याच देवी क्षेत्रात अष्टमीस रात्री चंडी होम करतात.या दिवशी देवीभक्तीचे एक प्रमुख अंग म्हणून काम क्रोधादीविकारांचे समूळ उच्चाटन करणे.या कृतीचे रूपक म्हणून चंडी होमात बलिदान म्हणून कुष्माण्ड बली (कोहळा) बली दिला जातो.
पण,यासाठी पशुंची हिंसा करणे हे मात्र बलिदानाचे व विकृत रूप म्हणावे लागेल.
खंडे नवमीला शस्त्र,उपकरणे व यंत्रे यांचे पूजन केले जाते.अर्थात त्याचा वापर योग्य वेळ योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने व्हावा हा त्या पाठीमागचा उद्देश असावा.
माता क्षमस्व असे म्हणून या व्रताची सांगता होत.देवीवरून ईशान्य दिशेकडे एक फुल वाहवे.नवरात्र समाप्तीच्या दिवशी देवीचे उत्थापन असते.विसर्जन नसते.त्यामुळे अक्षता देवीवर वाहून विसर्जन करू नये.मात्र अक्षता वाहून वरूण अर्थात घट व वेदिका यांचे विसर्जन करावे .
पेरलेल्या शेतांचे अंकुर सर्वांना प्रसाद म्हणून भक्षण करावेत.या मधील गव्हांकुराचे महत्व वेगळे सांगायला नको.
या नंतर देव्हाऱ्यातील सर्व देवता यांची षोडशोपचार पूजा करून आपल्या प्रथेनुसार दंपती किवा कुमारी यांना भोजन देण्याची प्रथा आहे.काही प्रांतात हा भोजनाचा विधी झाल्यावर मग नवरात्र उठवतात.नवरात्र काळात बऱ्याच कुटुंबात गोंधळ नामक विधी करतात.हल्ली नवरात्रात दररोज गोंधळाचा विधी करणे शक्य नसल्यामुळे फक्त अष्टमीच्या दिवशी एक दिवस गोंधळ घालण्याची प्रथा आहे .
विजयादशमी-दसरा हा नवरात्र समाप्तीनंतर येणारा कुलधर्म होय.काही ठिकाणी नवरात्रोत्थापन विजयादशमीस करण्याची प्रथा आहे.देवी क्षेत्रात विजयादशमीस देवीची उत्सव पूर्वक मूर्ती पालखीतून मिरवत नेली जाते.
विजयादशमीस देवीस पंचामृताचा महाभिषेक केला जातो.सायंकाळी सीमोल्लंघन केले जाते.हल्ली शहराच्या विस्तृती करणामुळे सीमोल्लंघनाचा विधी हा त्या त्या गावातील शिष्ट संकेतानुसरून सर्वसामान्य अशा एखाद्या ठिकाणी उदा.सार्वजनिक चौफुला,मंदिर आपट्यांचा वृक्ष इत्यादी ठिकाणी जाऊन पारंपारिक पद्धतीने साजरा करतात.विजयदशमीस शमी व आपटा या वनस्पतीच्या पानांची आपापसात देवान घेवान करतात.याला सोने लुटणे असे म्हणतात.
शमी शमयते पापं शमी शत्रुविना शिनी ।
अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रिय वादिनी ।
किंवा
शमी शमयते पापं शमी लोहितकण्टका ।धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रिय वादिनी ।
असे म्हणत काही लोक ही पाने एकमेकांना देतात .सीमोल्लंघना दिवशी स्त्रिया औक्षण करतात .
या देवी सर्वभूतेषु बुद्धीरूपेन संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.