महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका मजबूत करणे आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै महिन्यापासून दरमहा १ हजार ५०० रुपयेची आर्थिक मदत मिळेल. हे पैसे महिलांना त्यांच्या वैयक्तिक आणि घरगुती खर्च चालविण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी आणि कुटुंबाच्या निर्णयांमध्ये अधिक सक्रियतेने योगदान देण्यासाठी आर्थिक आधार प्रदान करतील.
महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. त्यांना आर्थिक स्वावलंबन देऊन आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून शासनाची महिलांच्या सामाजिक-आर्थिक विकासातील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते.
राज्य शासनाद्वारे ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आली आहे, या उपक्रमाचा महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांना लाभ होण्याची अपेक्षा आहे. आर्थिक सहाय्यावर लक्ष केंद्रित करून, सरकार महिलांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
शासनाने या योजनेतून महिलांना आर्थिक मदतीबरोबरच त्यांचे आरोग्य, पोषण आणि आर्थिक व्यवस्थापनावर भर दिला आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि जास्तीत जास्त महिलांना योजनेत सहभागी करून घेण्यासाठी शासन आग्रही असून योजनेत अडचणीच्या ठरणाऱ्या अनेक अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा प्रमुख घटक म्हणून महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी राज्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांच्या मालिकेचा एक भाग ठरेल, यात शंका नाही.
साभार………………………………………….
गजानन जाधव,
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली
योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :-
❖ २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांना लाभ
❖ लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक.
❖ लाभार्थी महिलेच्या बँक खाते असणे आवश्यक .
❖ लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे
❖ पिवळे व केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
❖ विवाहित,विधवा, घटस्फोटीत,परितक्त्या, निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ.
❖ योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र नसल्यास 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
❖ परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचा जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
❖ योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
❖ लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
❖ महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्रातील जन्मदाखला
❖ सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पनाचा दाखला.
❖ बॅक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
❖ पासपोर्ट साईजचा फोटो.
❖ रेशन कार्ड
❖ या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
या योजनेत अर्ज कसा करता येईल ?
➢ ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये/ग्रामपंचायत/वॉर्ड/सेतू सुविधा केंद्रे येथे उपलब्ध आहे.
➢ अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/ वार्ड अधिकारी यांनी ऑनलाईन प्रस्तावित केल्यावर लाभार्थी महिलेचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करता येईल
➢ अर्ज करण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे.
➢ अर्जदार महिलेने स्वत: अर्ज करताना उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल.
महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकांसोबत सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राज्य शासन पाठीशी उभे आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात असून महिलांना आर्थिक आधार देण्यात येत आहे.