मानव चंद्रावर केव्हाचं पोहोचला.अजूनही बरंच काही साध्य करण्याची त्याची धडपड चालूच आहे.सुख मिळवण्या साठीची धडपड,सुख मिळण्याच्या पलीकडे केव्हा गेली त्याला कळालंच नाही. वाढलेली लोकसंख्या कमी कशी करता येईल, त्यासाठीचे पर्याय तो शोधत आहे.शस्त्रास्त्र न वापरता युद्ध कशी करता येतील यासाठी नवे नवे व्हेरीअंट तो शोधत आहे,पण हे सगळं करत असताना त्याच्या मूलभूत मानसिक गरजा तो विसरत चालला आहे.प्रेम,जिव्हाळा,माया,शांती,मानसिक स्वास्थ्य,समाधान हे सगळं तो विसरून गेला की काय..? कळत नाही.संस्कृतीचा विसर तर त्याला पडला नाही ना हे सांगायलाच नको.असंच घडत राहिलं तर अशाच अवस्थेत कित्तेक पिढ्या अक्षरशः वाहून जातील आणि पुन्हा नव्याने जेव्हा संस्कृतीसाठीचं उत्खनन होईल तेव्हा त्या सगळ्याची ओळख करून देण्यासाठी कुसुमाग्रजांचं साहित्य पुढे येईल आणि सांगेल “प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश”
कुसुमाग्रजांनी आपल्याला प्रगल्भ विचार करायला अक्षरश: भाग पाडलं.कथा, कादंबऱ्या, कविता,नाटक या सर्व त्यांच्या वाड़ग्मयीन कलाकृती आपल्याला समृद्ध जीवन जगायला शिकवतात.ज्यावेळी ज्या गोष्टीची गरज होती त्यावेळी ती गोष्ट त्यांनी आपल्याला देऊ केली.स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्माला आलेली “क्रांतीचा जयजयकार” ही कविता. स्वातंत्र्यासाठी प्राणपणाला लावत कित्येक राजबंदी गजाआड जात, त्यावेळी ही कविता नुसती कविता न राहता त्या राजबंद्याच्या तोंडचे उदगार ठरतात.
“बलशाली मरणाहूनी आहे आमचा अभिमान।
मृत्युंजय आम्ही आम्हाला कसले कारागार।”
असे शब्द वाचताना खऱ्या देशभक्ताचे बाहू स्फुरण पावले नाहीत तरच नवल ! या कवितेतल्या प्रत्येक ओळीतला एकेक शब्द म्हणजे अंगार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात समाजावर इंग्रजांचा पगडा होता . आपली संस्कृती लोप पावणार की काय? त्यावेळी कुसुमाग्रजांचे साहित्य खूप काही देत राहीलं आणि समाजात त्या गोष्टीचा प्रतिबिंब पाहायला मिळालं.
नटसम्राट सारखं नाटक पाहताना कुसुमाग्रजांच्या प्रतिभासंपन्न भाषेच्या प्रेमात आपण पडतो. आपण कलाकार नसल्याची खंत बाळगत असतानाही त्यातील पल्लेदार संवाद पाठ करतो आणि स्वतःवरच खुष होतो, खरा कलाकार तर त्यातील आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका पार पाडल्यानंतर आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता झाली असंच समजतो. या नाटकातल्या सारखे संवाद आणि समृद्ध भाषेचा थाट पुन्हा पाहायला मिळाला नाही. प्रत्येक कलाकाराला ते एक शिवधनुष्य पेलण्यासारखे होतं.
इतिहास तुम्हाला माहिती हवा नाहीतर तुम्ही इतिहास काय घडवणार? हे आम्हाला कुसुमाग्रजांनी सांगितलं. प्रतापराव गुजर यांना महाराजांनी पत्र लिहिलं. आलेल्या उद्रेकाच्या आवेशात आपल्या सात सरदारांसह ते शत्रूच्या छावणीत प्रवेश करतात.” सात” या कवितेत कुसुमाग्रजांनी या प्रसंगाच इतकं यथार्थ वर्णन केलं आहे की, संपूर्ण इतिहास समोर येतो. देशप्रेम म्हणजे काय आणि धन्याला दिलेला शब्द पाळणे म्हणजे काय याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे “बाजीप्रभू देशपांडे”. “सरणार कधी रण प्रभू तरी हे!” शब्द लिहिले कुसुमाग्रजांनी पण हेच शब्द बाजीप्रभूंनी काढलेले असतील असं आपल्याला वाटू लागतं. आजही पन्हाळ्यावर गेलं की हे शब्द भावनिक करून सोडतात.
भारत शोधायला निघालेल्या कोलंबसाकडे कुसुमाग्रजांचं लक्ष जातं. त्याच्या धाडसाचं, निर्भयतेचं,ध्येय गाठण्याच्या वेडाचं वर्णन कुसुमाग्रज आपल्या “कोलंबसाचे गर्वगीत” मध्ये करतात या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी एखाद्या अभ्यासकाच्या अभ्यासाचा विषय ठरू शकतात.
“अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन् आशा!”
“किनारा तुला पामराला!”
कुसुमाग्रज रसिक होते. स्वर्गीय सैगलांच्या आवाजावर त्यांनी मनस्वी प्रेम केलं. सैगल या कवितेत ते म्हणतात
“अशीच संगीते आळवी तुझी कलावंता ! घडीभर जागवे आमची अशीच मानवता!”
लोप पावत चाललेली मानवता कुसुमाग्रजांना सतत जाणवत असावी म्हणून घडीभर का होईना मानवता राहण्यासाठी सैगलांना सदैव गात रहा असं सांगत आहेत.
“कणा” सारखी कविता वाचताना त्यांच्या जाणिवा जाग्या कशा होत्या हे सांगून जाते. पुराचं पाणी जेव्हा एखाद्या परिस्थितीने गांजलेल्या गरीबाच्या घरात येतं तेव्हा काय विदारक चित्र उभं राहतं त्याचं वर्णन या कवितेत आपण वाचतो. या कवितेत उभा केलेला तरुण खूप उमेद ठेवून जगणारा आहे. कोणत्याही प्रकारची मदत त्याला अपेक्षित नाही पाठीवर हात ठेवून लढण्याचं बळ देणारा त्याला हवा आहे. अशा तरुणासारखे कित्येक तरुण कुसुमाग्रज यांच्याकडे आले असतील सर्वार्थानं मदतीचा हात त्यांच्या पाठीवरून फिरला असेल पण त्याची वाच्यता मात्र कधी केली नाही.
कुसुमाग्रज आपल्या आयुष्यात आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहिले त्यात तडजोड कधीच केली नाही ज्या तळमळीने आणि अधिकारवाणीने त्यांनी कविता लिहिल्या त्यामागे चारित्र्याचे आणि पावित्र्याचे अधिष्ठान आहे हे अधिष्ठान त्यांनी प्रयत्नपूर्वक सांभाळले होते. शुद्ध चारित्र्यामुळे वाड़ग्मयीन शब्दांना सुद्धा वजन आणि महत्त्व प्राप्त होते, पुढील पंक्ती हेच सांगून जातात. “पाच पुतळे” या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात
“पुतळ्यांना अधिकार नसतो संतप्त होण्याचा, भोवतालच्या व्यवहारात उतरण्याचा,
त्यांना अधिकार असतो जयंती मयंती च्या हारांचा
एरवी काकदिक पक्ष्यांच्या विष्ठाप्रदान सहवासाचा!”
“प्रेम” हा शब्द घेऊन आलेल्या कुसुमाग्रज यांच्या कविता प्रेम हा शब्द किती व्यापक आहे ते सांगते. त्याचबरोबर त्या सुंदर शब्दाच्या अविष्काराचा दर्शन घडवतात. पृथ्वीचे प्रेमगीत हे त्याच व्यापक स्वरूप.
प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि त्याच्या भविष्यकाळातील अभ्युदयाची आशा एकमेव!
भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं प्रेम करायला सुचवणारे कुसुमाग्रज मिश्किल होऊन सत्याचं भान त्या तरुणाला करुन देताना म्हणतात.
…..जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय…. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं.
१९३३ पासून जनमानसात रुजायला लागलेली त्यांची कविता आज नव्वदीत सुद्धा तेवढीच टवटवीत आणि ताजी आहे.
१९९६ साली कुसुमाग्रज हा तारा त्यांच्या जन्मदिनी झळकू लागला. अमेरिकेतील इंटरनॅशनल रजिस्ट्री या संस्थेकडे कुसुमाग्रजांवर मनापासून प्रेम करणारे हिऱ्याचे व्यापारी लागू बंधू यांनी “कुसुमाग्रज” या नावाने तो नामांकित करून ठेवला आहे.
आज आकाशात एका तेजस्वी तार्यावर नजर स्थिरावते आणि लक्षात येतं कुसुमाग्रज नाव घेतल्यापासून हा तारा खूप तेजाने आणि दिमाखाने चमकत आहे आणि म्हणूनच तो “दुसरा ध्रुवतारा” आहे.
सौ.वंदना प्रकाश माने
(राजाचे कुर्ले)
73 87 86 65 65