न्यूयॉर्क । भारत आणि पाकिस्तानमधील रविवारी झालेला सामना अनेक अर्थांनी रोमहर्षक राहिला. सामन्या दरम्यान येणारा पाऊस, कमी झालेली धावसंख्या यामुळे सामन्यात रंगत वाढली होती. हा सामना भारताने सहा गडी राखून जिंकला. पाकिस्तानच्या बाजूने पूर्ण झुकलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या सहा षटकांत धमाकेदार कामगिरी केली. त्यामुळे सामना भारताच्या खात्यात आला.
न्यूयॉर्कमधील नसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत केवळ 120 धावांचे आव्हान पाकिस्तानसमोर ठेवले होते. पाकिस्तानच्या संघाने पाहिल्या 14 षटकांत पूर्णपणे सामन्यावर वर्चस्व निर्माण केले होते. परंतु त्यानंतर भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी कमाल केला अन् पाकिस्तान पराभूत झाला. पाकिस्तान 7 गडी गमावत 113 धावाच करु शकला. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताची पाकिस्तानविरोधात 8 सामन्यातील हा 7 सातवा विजय आहे.
या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे हिरो होते जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या.या दोघांनी आपल्या गोलंदाजीनं सामना पलटवला. एके काळी पाकिस्तानची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 72 धावा होती. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केलं. जसप्रीत बुमराहनं 4 षटकात अवघ्या 14 धावा देत 3 बळी घेतले. हार्दिक पांड्यानंही फखर जमान आणि शादाब खानला बाद करून त्याला चांगली साथ दिली. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अर्शदीपनं सामन्यातील शेवटचं षटक टाकलं, ज्यामध्ये पाकिस्तानला विजयासाठी 18 धावा करायच्या होत्या.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियानं दुसऱ्याच षटकात विराट कोहलीची विकेट गमावली. कोहली नसीम शाहच्या चेंडूवर 4 धावा करून पायचीत झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माही शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर आऊट झाला. रोहितनं 13 धावा केल्या. यानंतर डावखुरा फलंदाज अक्षर पटेल आणि रिषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 39 धावा जोडून डाव सांभाळला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षरला नसीमनं बोल्ड केलं.
अक्षर पटेल बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली. एकेकाळी भारताची धावसंख्या 3 गडी बाद 89 धावा होती आणि संघाला या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळेल असं वाटत होतं. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिले. भारतानं 30 धावांत 7 विकेट गमावल्या.
भारतीय संघ केवळ 19 षटके खेळू शकला आणि 119 धावा केल्या. रिषभ पंतनं सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. त्यानं 31 चेंडूच्या आपल्या खेळीत 6 चौकार हाणले. अक्षर पटेलनं 18 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 20 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफ आणि नसीम शाहनं प्रत्येकी 3 बळी घेतले. तर मोहम्मद आमिरला 2 विकेट मिळाल्या.