॥ तिळगुळ घ्या गोड बोला ॥ मकर संक्रातीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्राती असे म्हणतात.
सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीचा पुण्यकाल सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे.
संक्रातीच्या पर्वकाळात दात घासणे,कठोर बोलणे,वृक्ष गवत तोडणे,गाई म्हशींची धार काढणे,कामविषय सेवन इ. कर्मे वर्ज सांगितलेली आहेत.
दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सूर्य मकर राशीत सोमवारी पहाटे 02 वाजून 43 मिनिटांनी प्रवेश करतो आहे.
मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते.
आपला पंचभौतिक देह म्हणजे घट,याचे प्रतीक म्हणून घटामध्ये धान्य,गाजर,ऊस इत्यादी अनेक भाज्या ठेवून घटाचे पूजन करण्याची परंपरा आहे.
या महिन्यात शिरीर ऋतूतील हिवाळा भाज्यांसाठी पोषक असतो.त्यामुळे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात.तसेच शेताला नवीन बहर आलेला असतो.
या भोगी सणानिमित्त भोगीची भाजी यात प्रामुख्याने हरभरा,पावटा,घेवडा,वांगे,गाजर,कांद्याची पात,शेंगदाणा,वाटाणा,फ्लॉवर इ. भाज्या वापरल्या जातात. आणि त्या सोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि राळ्याच्या तांदळाचा भात करण्याची परंपरा आहे.भोगीची भाजी अतिशय चवदार लागते.भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते.या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी प्रसादात असते.
तिळ मिश्रित उदकाने स्नान,तिळाचे उटणे अंगास लावणे,तिल होम,तिलार्पण,तीलभक्षण व तिळ दान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो असे शास्त्र सांगते.
म्हणून या दिवशी एकमेकांना
॥गुळ घ्या गोड बोला ॥
तिळगुळ देऊन हा आनंद उत्सव साजरा केला जातो.
नवे भांडे,गाईला घास अन्न,तीळपात्र,गुळ,तीळ,सोने,भूमी,गाय,वस्त्र घोडा इ. दान शास्त्रात सांगितले आहे.
म्हणून या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे.सुवासिनी स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू समारंभ आयोजित करून एकमेकिंना वाण देतात.
मकर संक्रातीचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्व पाहता…
मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते भोगीच्या दिवशी अनेक भाज्यांचे सेवन असते.कारण अनेक भाज्यातील पौष्टिक तत्व मानवाच्या शरीरास मिळावे.तसेच थंडीच्या वातावरणात तिळमिश्रित बाजरीची भाकरी खावून शरीरामध्ये उष्णता टिकून रहावी.हा त्या पाठीमागे उद्देश असावा असे मला वाटते .
त्याच बरोबर या ऋतूमध्ये अनेक भाज्यांचे पचनही व्यवस्थित होऊ शकते.
मकर संक्राती दिवशी तिळाचे तेल लावून अभ्यंग स्नान सांगितले आहे.कारण थंडीच्या दिवसात तिळाच्या तेलाचे महत्व आयुर्वेदानुसार वेगळे सांगायला नको.तसेच या ऋतूत तिळ गुळ खाने आरोग्यास चांगले असते असे आयुर्वेद सांगते.
मकर संक्रमण पुण्यकाळात दानाला विशेष महत्त्व असल्यामुळे तिळगुळ स्नान,दानादि कृत्ये करून हा आनंद उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसतो.
मकर संक्राती 15 जानेवारीला का ?पूर्वी 14 जानेवारी येत असे?
मकर संक्रांति ही सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करण्यावर अवलंबून आहे.ती 14 जानेवारीला येते असे मात्र मुळीच नाही.सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत 365 दिवस,6 तास,9 मिनिटे व 10 सेकंद एवढा कालावधी लागतो.याचाचअर्थ प्रत्येक वर्षी मकर राशीत प्रवेश सुमारे 6 तास पुढे जातो म्हणजे 4 वर्षांनी 1 दिवस अर्थात 24 तास पुढे जाणे आवश्यक आहे.परंतु इंग्रजी कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे 4 ने भाग जाणाऱ्या वर्षी म्हणजेच प्लुत अर्थात लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात व त्या वर्षाचे दिवस 366 होतात.या 29 फेब्रुवारी मुळेच संक्रात अनेक वर्षे एका तारखेला येते.परंतु ज्या शतक वर्षांना 4 ने भाग जातो,पण 400 ने भाग जात नाही,त्या वर्षी फेब्रुवारी 28 दिवसांचा असतो.त्यामुळे त्या शतक वर्षापासून संक्रांत एक तारीख पुढे जाते.मात्र 6 तास ,9 मिनिटे,10 सेकंदांनी संक्रमण वेळ जास्तीची असल्याने तो काळ साठत जाऊन 157 वर्षांनी मकर संक्रात एक दिवसाने पुढे जाते.पण हा बदल एकदम होत नाही तो टप्प्याटप्प्याने होतो .
पहिल्या टप्प्यात दर चार वर्षांनी 1 दिवस,दुसऱ्या टप्प्यात 3 वर्षांनी 1 दिवस,तिसऱ्या टप्प्यात 2 वर्षांनी एक दिवस आणि चौथ्या टप्प्यात एकच तारीख काही वर्ष राहते.सन 200 मध्ये निरयन मकर संक्राती 22 डिसेंबरला येत होती.सन 1899 मध्ये निरयन मकर संक्राती 13 जानेवारीला आली होती.सण 1972 पर्यंत मकर संक्राती 14 जानेवारीला येत होती.1972 पासून सन 2085 पर्यंत निरयन मकर संक्रात कधी 14 जानेवारीला तर कधी 15 जानेवारीला असणार आहे.इसवी सन 2085 नंतर दर वर्षी ही मकर संक्रात 15 जानेवारीला असेल.त्यानंतर सन 2100 ला 400 ने भाग जात नसल्याने सन 2100 पासून निरयन मकर संक्राती 16 जानेवारीला येईल.अशा रीतीने पुढे सरकत सरकत सन 3246 मध्ये मकर संक्राती एक फेब्रुवारीला येणार आहे.असं गणित दाते पंचांग कर्ते मोहनराव दाते यांनी त्यांच्या कालसुसंगत आचारधर्म या ग्रंथात उल्लेख केलेला आहे .
म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत इंग्रजी तारखे ऐवजी तिथीनुसार भौगोलिक परिस्थिती वातावरणातील होणारे बदल,त्या ऋतूत पिकले जाणारे धनधान्य,फळे,पालेभाज्या त्याचा मानवाच्या शरीरावर होणारा शुभ परिणाम याचा विचार करून आपल्या सणांची संस्कृती दिसते.यावरून पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन किती खोल होता हे समजते.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तु सल्लागार आहेत)