अहमदाबाद । नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेटने पराभव करत सहाव्यांदा चषकावर नाव कोरले. ट्रेविस हेडचं झंझावती शतक आणि लाबुशनेचं संयमी अर्धशतकामुळे भारताच्या विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगले. भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियानं याआधी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे.
या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान ठेवले होते.या धावांचा पाठलाग करताना भारतीय दमदार सुरुवात केली होती. दुसऱ्याच षटकात मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला बाद करून माघारी धाडलं होतं.
वॉर्नर पाठोपाठ मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथने देखील पॅव्हेलियनची वाट धरली.इथून भारतीय संघाने सामन्यात कमबॅक केलं होतं.मात्र ट्रेविस हेडचा डोक्यात काहीतरी भलतंच सुरू होतं.त्याने सुरुवातीला संथ खेळी करत डाव पुढे नेला.
त्याला मार्नस लाबुशेनने चांगली साथ दिली.भारतीय गोलंदाज एकीकडे विकेट्स घेण्याच्या प्रयत्नात होते.तर दुसरीकडे हेड आणि लाबुशेनने एकेरी दुहेरी धाव घेत स्कोअर बोर्ड हलता ठेवला.दोघांनी मिळून मोठी भागीदारी केली.त्यामुळे हा सामना भारतीय संघापासून दूर गेला.
भारतीय संघाने दिलं 241 धावांचं आव्हान..
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं.भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करताना रोहित शर्माने 47 धावांची खेळी केली. तर शुभमन गिल अवघ्या 4 धावा करत माघारी परतला. भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 54 धावांचे योगदान दिले.भारतीय संघाचा संपूर्ण डाव 240 धावांवर संपुष्टात आला.