मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची इस्लामपूर येथे जाहीर सभा
सभेस मराठा बांधवांची अभूतपूर्व गर्दी…
सचिन कांबळे-झेले/अधोरेखित ऑनलाइन
सांगली । राज्यात जाती-जातीत तेढ निर्माण करून दंगली घडविण्याचा मंत्री छगन भुजबळांचा प्रयत्न असल्याची टीका मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी इस्लामपूर येथील सभेत केली.मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत एक इंच ही मागे हटणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मराठा समाज बांधवानी येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
इस्लामपूर येथील मा.जयंत पाटील खुले नाट्यगृहात आरक्षणासंदर्भात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सभेला उपस्थित होते.
ओबीसी समाजाच्या मेळाव्यात आज मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती.त्याला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देत समाचार घेतला.ते म्हणाले,छगन भुजबळ यांनी आज पातळी सोडली.राजकीय स्वार्थासाठी ओबीसी आणि मराठा अशी ते झुंज लावू शकतात.जाती-जातीत तेढ निर्माण करून दंगली घडवायचा त्यांचा डाव असून समाजाला उसकवायचे काम ते करीत आहेत.मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडायला सुरू झाल्यापासून एकाचं तर लईच चाललं आहे.मी घाबरणार नाही,पठ्ठ्या आहे.त्या व्यक्तीबद्दल मला आदर होता,पण आता वयाच्या मनाने बरळत आहे.आमचं जेवण तुम्ही काढून घ्यायला लागला.मला तर तुमचं सगळंच माहीत आहे,मुंबईत काय काय करता ते.आतापर्यंत आमच्या लोकांचं रक्त गोचिडा सारखं प्यायला म्हणूनच तळतळाट लागला आणि तुम्ही तुरुंगात बेसन खायला लागला.मराठ्यांना चारही बाजूंनी घेरलयं,आता गाफील राहू नका.सावध राहा.मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि मराठा ओबीसीमध्ये जाणार असल्याचे समजल्यापासून अनेकांचा तिळपापड सुरू झाला आहे.
आरक्षणाचे पुरावे असताना सरकारने बुडाखाली ठेवले
ते म्हणाले,आरक्षणाअभावी आमच्या लेकरांच्या जाग हडप केल्या.आरक्षणाने आमच्या लेकरांचा घात केला आहे.ओबीसी नेत्यांचा दबाव राज्य सरकारवर होता.आरक्षणाचे पुरावे असताना सरकारने बुडाखाली ठेवले.मराठ्यांची एकजूठ बघून सरकारने पुरावे शोधण्यास सुरुवात केली.७० वर्षांपासून मराठा समाज आरक्षणात आहे.पण त्याचे दस्तऐवज,पुरावे सापडत नव्हते आता ते सापडू लागले आहेत. ७० वर्षात न मिळालेल्या कुणबीच्या नोंदी सुरवातीला हजारात मिळाल्या.आता त्याचा आकडा लाखोंवर गेला आहे.ते जर आधी केलं असतं तर आपली लेकरं कुठल्या कुठं गेली असती.७० वर्षापूर्वी आरक्षण मिळाले असते तर मराठा समाज जगात प्रगत समाज असता.
गाफील राहू नका… सर्वांनी सज्ज रहा
ते म्हणाले,मराठ्यांना चारही बाजूने घेरले जात आहे.हा वेढा तोडण्यासाठी आपल्यात एकी ठेवावी लागणार आहे.आरक्षण असलेले आणि नसलेल्या मराठ्यांना सर्वांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत सर्वाना एकत्र यावे लागेल.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी यापूर्वी आयोग समित्या झाल्या.त्यांनी मात्र एकच सांगितले की मराठयांचे पुरावे नाहीत. त्यामुळे आरक्षण देता येत नाही. आता समितीने पुरावे शोधायला सुरुवात केली असून ७० वर्षांपासूनचे पुरावे निघाले.१८०५ पासून १९६७ पर्यंत आणि १९६७ पासून २०२३ पर्यंत लाखो मराठ्यांचे पुरावे सापडले आहेत.यातून मराठा ओबीसी आहे. हे आता सिद्ध झाले आहे.ओबीसींच्या किंवा कायद्याच्या चौकटीत येण्यासाठी जे काही निकष लागतात,ते सर्व मराठा समाजाने पूर्ण केले आहेत.मात्र आरक्षण घेण्याचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे.आपल्या लेकारांच्या हितासाठी तयारी करा.मुलांचे करिअर वाचवायचे असेल तर सर्वांनी सज्ज रहा.एकजुटीशिवाय आपल्याला पर्याय नाही.
मराठ्यांनी अनेकांना साहेब केलं, पण आता एकही साहेब रस्त्यावर येत नाही
ते म्हणाले,गेल्या ७० वर्षात जेवढे पक्ष निघाले ते सगळे पक्ष आपल्या बापजाद्यांनी मोठे केले.ज्या नेत्यांना तुम्ही आम्ही मोठं केलं ते नेते मराठ्यांच्या बाजूने बोलायला तयार नाहीत.एकही नेता आपल्यासाठी पुढे येणार नाही.आपल्या लेकरासाठी कोणी नेता येणार नाही.आपली लढाई आता स्वतः लढायची आहे.तुम्ही साहेबाला मोठं केलं,साहेबांच्या बापाला,आजोबाला मोठं केलं.त्यांनी तुमच्यासाठी काय केलं? त्यांचा पोरगा परदेशात जातो,शिकून येतो,आपली पोरं त्याला भैय्या म्हणत्यात,तो आपल्या पोरांना नाम्या,तुक्या म्हणतो.आता शहाणं व्हा.आपल्या घरातलं मराठा पोरगं मोठं होऊ द्या.आधी लेकराच्या भाकरीचं बघा.नंतर कुणाचा झेंडा उचलायचा ते उचला.हीच वेळ आहे, आरक्षणाशिवाय सरकारला सुटी द्यायची नाही.
१ डिसेंबरपासून गावागावात शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण
शांतीचे ब्रम्हास्त्र रोखण्याची हिम्मत कोणातही नाही.त्यामळे आंदोलन शांततेत करा.शांतीचा भाग कोन्हीही करू नका.आपल्याला शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळवायचे आहे.सरकारला २४ डिसेंबरला आरक्षणाचा कायदा पारित करावा लागेल.अन्यथा १ डिसेंबर पासून गावागावात शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण सुरू झाले पाहिजे.मागे हटू नका,गावे पिंजून काढा असे आवाहन जरांगे -पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांना केले.
क्षणचित्रे……………………………………….
🌑 मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांचे रात्री 11 वाजता तहसील चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन…
🌑 मनोज जरांगे-पाटील यांचे रात्री 11.15 वाजता सभेच्या ठिकाणी आगमन
🌑 सभेस रात्री 11.25 वाजता सुरवात…
🌑 समोर मराठ्यांचा थवा दम असेल रोखून दावा…!
मनोज जरांगे पाटील यांची ललकारी
🌑 भव्य व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती…वातावरण शिवमय
🌑 जय भवानी जय शिवाजी या घोषणेने परिसर दुमदुमला…
🌑 एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणेने संबंध मराठा एकटवला….!
🌑 विशाल ताकवडे हलगी लक्षवेधी ठरली…
🌑 मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची चित्रफीत…सखल मराठा समाज यांचा धगधगता प्रवास…थक्क करणारा होता आणि पुढे ही असेल…
🌑 आपापसात राजकीय वैर असणारे शहरातील लोकप्रतिनिधी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिसले…