मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे
जालना । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे.मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
राज्य सरकारला महिन्याभराचा अवधी देण्याचा निर्णय बुधवारीच मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला होता.मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी संध्याकाळीच मनोज जरांगेंना भेटायला जाणार होते.दरम्यान,त्याआधी जरागेंनी उपोषण मागे घ्यावे,यासाठी सरकार आणि जरागे पाटील यांच्या शिष्टमंडळामध्ये अनेक बैठका झाल्या.अर्जुन खोतकर,गिरीश महाजन यांनीही त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती,पण जरांगे आपल्या उपोषणावर ठाम होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज उपोषणस्थळी आले.आल्यावर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीवर हात ठेवला.त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली त्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाचही मागण्यांवर त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेव.मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही,असे आश्वासन दिले.त्यानंतर जास्त आढेवेढे न घेता उपोषण मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जरांगे यांनी सरकारला 40 दिवसाचा वेळ दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, रद्द झालेले आरक्षण आपल्याला पुन्हा मिळायला पाहिजे ही सरकारची भूमिका असल्याचे सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा व शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.
आंतरवालीत झालेला लाठी हल्ला अतिशय दुर्दैवी घटना होती, असे नमूद करून त्याबाबत स्वतः गृहमंत्र्यांनी माफी मागितल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा समाज हा अतिशय शिस्तप्रिय आणि संवेदनशील आहे. मराठा समाजाकडून राज्याने, देशाने शिस्त आणि शांतता आंदोलनाची धडा घेतला आहे. परंतु, दुर्दैवाने त्याला गालबोट लागले.या प्रकरणी ज्यांचा दोष होता त्यांना निलंबित केले आहे. आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,मंत्री गिरीश महाजन,अतूल सावे यांच्यासह सरकारचे दोन अधिकारीदेखील चर्चेसाठी उपस्थित आहेत.तर उपोषणस्थळी मंत्री संदीपान भुमरे आणि माजी आमदार अर्जुन खोतकर आधीच होते.