बेंगळुरू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
शास्त्रज्ञांना संबोधित करताना चांद्रयान-3 च्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी झाले भावूक
बंगळुरू | चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूमधील इस्रोच्या कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले.चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.चांद्रयान-3 च्या यशानंतर पंतप्रधान मोदी बेंगळुरूमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना भावूक झाले.यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली. आजपासून दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा केला जाईल,असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
बेंगळुरू येथील इस्रोच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, अधीरता असताना अनेकवेळा असे घडते,यावेळी माझ्यासोबत असेच घडले.मी दक्षिण आफ्रिकेत होतो आणि नंतर ग्रीसला गेलो पण माझे मन तुमच्यासोबत होते.मला लवकरात लवकर तुम्हांला भेटून सलाम करायचा होता.पंतप्रधान म्हणाले की, आज मला एका वेगळ्या प्रकारचा आनंद वाटत आहे. असे क्षण दुर्मिळ असतात.
‘चांद्रयान हे केवळ भारताचे नाही तर संपूर्ण मानवतेचे यश’
पीएम मोदी म्हणाले,जिथे कोणी पोहोचले नव्हते तिथे आम्ही पोहोचलो.आम्ही ते केले जे यापूर्वी कोणी केले नाही.पीएम मोदी म्हणाले,’एक काळ असा होता जेव्हा आमची गणना तिसऱ्या रांगेत होत होती.
आज व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताची गणना पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत आहे.तिसऱ्या रांगेतून पहिल्या रांगेपर्यंतच्या या प्रवासात आपल्या इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे.आज संपूर्ण जग भारताची वैज्ञानिक शक्ती ओळखते.चांद्रयान महाअभियान हे केवळ भारताचे यश नाही तर ते संपूर्ण मानवतेचे यश आहे.
‘विक्रम लँडर उतरलेल्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव…’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 23 ऑगस्टच्या दिवसाचा प्रत्येक सेकंद माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा फिरत आहे.विक्रम लँडर उतरल्यावर इस्त्रो केंद्रात देशभरातील लोकांनी उड्या मारल्या,हे दृश्य कोण विसरू शकेल.काही आठवणी अजरामर होतात,ते क्षण अजरामर झाले.ते म्हणाले की,चांद्रयान-3 मोहीम ज्या ठिकाणी चंद्रावर उतरली होती ती जागा आता ‘शिव-शक्ती’ म्हणून ओळखली जाईल.23 ऑगस्ट रोजी चंद्रावर भारतीय तिरंगा फडकवण्यात आला होता,त्यामुळे आजपासून हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा केला जाईल.जेव्हा प्रत्येक घरात तिरंगा असतो तेव्हा प्रत्येक हृदयात तिरंगा असतो आणि आता चंद्रावरही तिरंगा आहे,असे पंतप्रधान मोदी म्हणाले.चांद्रयान-2 मोहिमेचे ठिकाण यापुढे ‘तिरंगा पॉइंट’ म्हणून ओळखले जाईल.हा तिरंगा बिंदू भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा बनेल,हा तिरंगा बिंदू आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते.
तत्पूर्वी,पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरून थेट बंगळुरूला पोहोचले आणि त्यांनी तेथे इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली.चांद्रयान-३ च्या यशाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.इस्रो केंद्रात पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ आणि इतर शास्त्रज्ञांनी त्यांचे स्वागत केले.