मुंबई । महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ २० ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांची यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017 – 18, सन 2018 – 19 आणि सन 2019 – 20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या प्रकियेला सुरूवात करण्यात आली आहे.
सुमारे 7.15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण
आतापर्यंत सुमारे 7. 15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. दि. 20 रोजीच्या कार्यक्रमात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केल्याबदल निवडक पात्र शेतकरी बांधवांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही मंत्री सावे म्हणाले.