शारदीय नवरात्रौत्सव
गुरुवार 26 सप्टेंबर 2022 पासून शारदीय नवरात्राचा प्रारंभ होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथीला घटस्थापना केली जाते,काही लोक याला कलश स्थापना असेही म्हणतात.
गणेशोत्सव संपला की अर्थातच वेध लागतात ते नवरात्राचेच.सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तुलनेत महाराष्ट्रात दुर्गोत्सव सध्या मोठया प्रमाणात साजरा केला जाऊ लागला आहे.शरद ॠतूतील आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत होणारे शारदीय नवरात्र हा एक परंपरेचा भाग आहे.शारदीय नवरात्राला दुर्गादेवीचे नवरात्र म्हणतात.या नवरात्राखेरीज चैत्र ते फाल्गुन या मराठी 12 महिन्यांच्या काळात चार वेगवेगळी नवरात्रे साजरी केली जातात.नवरात्राच्या या सणाची परंपरा खूप मोठी असून, तब्बल तीन हजार वर्षांपासून हा सण आपल्या येथे साजरा केला जातो. प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत काळ हा कृषिप्रधान उत्सवासाठी निश्चित केलेला आहे.
देवीचा उत्सव वर्षातून दोन वेळा साजरा करण्याची ही प्रथा अगदी वेदकाळापासून चालत आली आहे. चैत्री पौर्णिमा आणि विजयादशमीला असा दोन वेळा साजरा केला जाणारा हा उत्सव शेतकर्यांच्या कामाशी निगडीत आहे. रब्बीचा हंगाम सुरू झाला. की चैत्रातील उत्सव आणि खरिपाचा सुगीचा हंगाम सुरू झाला की, नवारात्रौत्सव.शेतीची कामे संपली की शेतकर्यांना ऊत्साहाने या ऊत्सवात सहभागी होता यावे अशी यामागील संकल्पना.
याच नऊ दिवसात दररोज माळ चढवली जाते. अनेक पौराणिक कथा या उत्सवाशी निगडित आहेत. महिषासुराचा वध करणार्या महिषासुरमर्दिनीचा हा उत्सव ही या मागील प्रमुख संकल्पना. रावणावर प्रभू रामचंद्रांनी विजय मिळविला तो विजयादशमीलाच.आजही विजयादशमीला आवर्जून सीमोल्लंघन केले जाते.आपटयाची पाने सोने म्हणून लुटली जातात.
प्रतिपदा ते विजयादशमी या कालावधीत विविध गुणांची जोपासना समाजात व्हावी या ऊदात्त हेतूने हा उत्सव केला जातो. खंडेनवमीला शस्त्रपूजन,नऊ रात्री देवीचे जागरण दशमीचे सीमोल्लंघन या सर्व बाबी समाजात वेगवेगळे चांगले विचार रुजवतात.
देवीच्या ऊत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीने स्त्री शक्तीची उपासना केली जाते. सरस्वती,दुर्गा, काली ही स्त्री शक्तीची प्रमुख रुपे,महन्मंगल, मातृरुप पार्वती,कलासक्त गौरी अशा अनेक रुपात तिची आराधना केली जाते.
संपूर्ण भारतवर्षात देवीची 51 शक्तिपीठे असून,त्यापैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत.कोल्हापूरची अंबाबाई,तुळजापूरची भवानी,माहुरगडची रेणुका ही तीन पूर्ण पीठे व वणीची सप्तशृंगीनिवसिनी हे अर्धपीठ,महिषासूराचा वध केल्यानंतर काही काळच आदिशक्ती येथे विसावली होती.त्यामुळे हे अर्धे पीठ मानले जाते.
वेदकाळापासून सुरु झालेला हा ऊत्सव आता समाजाच्या विविध घटकांना सामावून घेत वाढतच आहे.सृजनतेची, स्त्रीर् शक्तीची ऊपासना करणार्या या 9 दिवसांत दुष्ट प्रवृत्तींवर सुष्ट प्रवृत्तीनी मिळविलेले विजय,हेच या ऊत्सवाचे मुख्य प्रतीक आहे.मांगल्य, ऊत्साह, सत्प्रवृत्तीचा विजय हीच नवरात्रीची प्रमुख संकल्पना आहे.
नवरात्राबाबत विविध कथा लोकमानसात रूढ आहेत.महिषासूर नावाचा एक राक्षस अतिशय प्रभावी बनला होता.त्याने स्वतःच्या सामर्थ्यावर सर्व देवांना आणि मनुष्यांना त्राहि माम् करून सोडले होते.सारे देव भयभीत झाले होते. असुरी वृत्ती वाढत चालली होती. त्यामुळे सर्वाना ऊपद्रव होत होता. धैर्य गळालेल्या देवांनी ब्रम्हा,विष्णू व महेश यांची आराधना केली.
सर्व देवांनी आपल्या शक्तीचे, सामर्थ्याचे एकत्रीकरण करावे असे आवाहन केेले गेेले.त्यातूनच सर्व शक्तीमान अशी महादेवता प्रगट झाली.तीच दुर्गा होय.शंकराच्या तेजाने दुर्गेचे मुख्य ऊत्पन्न झाले.यमाच्या तेजाने तिच्या मस्तकावर केस निर्माण झाले. विष्णूच्या तेजाने तिला भुजा फुटल्या. चंद्राच्या तेजाने तिचे स्तन निर्माण झाले. इंद्राच्या तेजाने कटिप्रदेश निर्माण झाला. वरुणाच्या तेजाने पोटर्या, ब्रम्हाच्या तेजाने तिचे पाय, सूर्याच्या तेजाने पादांगुली ,वस्तुंच्या तेजाने करांगुली कुबेर तेजाने नासिका, प्रजापत्य तेजाने दंत अग्नीच्या तेजाने त्रिनेन्न,सांध्य तेजाने भुवया व वायूतेजाने कान निर्माण झाले, असे मार्कंडेय पुराणात दुर्गेचे वर्णन आहे.
सर्व देवांच्या व देवतांच्या तेजाचे एकत्रीकरण होऊन निर्माण झालेल्या या सर्व शक्मिमान देवतेचे सर्व देवर्देवतांनी मनोभावे पूजन केले. तिचा स्वतःच्या विविध शस्त्र र्अस्त्रांनी सुसज्ज केले.त्या दैवी शक्तीने 9 दिवस आहोरात्र युध्द करून महिषासुराला ठार केले आणि आसुरी वृत्तीला नाहीसे करून दैवी शक्तीची पुनर्स्थापना करून देवांना अभय दिले. फक्त महिषासूरालाच तिने यमसदनी पाठविले असे नाही.तर चंड-मुंड आणि शुंभ-निशुंभ या बलदंड दैत्यांना कंठस्नान घालून दुर्गादेवी ही महाशक्ती ठरली.
वरील कथा पौराणिक असली तरी त्यातील आशय असा आहे,की सर्व देव देवतांनी आपल्या तेजातून निर्माण केलेली ही देवता.सर्व चांगल्या सुष्ट शक्तीचे एकत्रीकरण व दुष्ट शक्तीविरुध्दचा संघर्ष आणि तिने मिळविलेला दैदीप्यमान विजय, हा नवरात्राव्दारे युगानुयुगे दिला जाणारा संदेश आहे.
’देवी’ हा शब्दांचा अर्थच मुळी शक्ती असा आहे.ही शक्ती स्वयंभू, संज्ञागर्भ अशी असल्याने तिला आदिशक्ती असे म्हणतात.या शक्तीचे वैशिष्टय असे की तिला आदी असला तरी अंत नाही आदि या शब्दाचा अर्थसुध्दा ऊत्पन्न असा नसून तिच्या सत्तेचा प्रथम साक्षात्कार असा आहे. म्हणजेच अशी एक आदिशक्ती आहे की,जिच्यावर सत्व, रज तमांचा भूत,वर्तमान व भविष्यादी कालांचा,दिशांचा आणि कोणत्याही देशाचा परिमाण होत नाही.तर या सर्वावर मात्र जिचा परिणाम होतो अशी ही असणारी,सर्वकाळ असणारी म्हणून हिच्या दर्शनासाठी देवसुध्दा ऊत्सुक असतात.
श्री महालक्ष्मी ही मुख्य देवता असून,श्रीमहाकाली व श्रीमहासरस्वती ही तिचीच प्रासंगिक रूपे आहेत.चंडिका,भद्रा,अंबिका ही महालक्ष्मीचीच दुसरी नांव. अथवा तिचे अंशावतार आहेत.महाकालीचे अंशावतार महामाया,महामारी,एकवीरा इत्यादी असून, महासरस्वतीचे अंशावतार भारती, सुरेश्वरी इत्यादी आहेत.चंडिका,भगवती,दुर्गा,शर्वी,त्रिपुरा,भुवनेश्वरी,भैरवी,श्यामा,ललिता,चंडी,चामुंडा,शांतादुर्गा इत्यादी विविध नावांनी हया त्रिशक्ती प्रसिध्द आहेत. बंगालमध्ये दुर्गा अणि कालिमाता विशेष प्रसिध्द असून, तिचे दुर्गा ऊत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा ते पौर्णिमापर्यंत साजरा केला जातो.
श्रीमहाकाली तमोगुणी असून मधुकैटभ राक्षसांच्या वधासाठी तिचा अवतार झाला. तिला दहा तोंडे, दहा हात, दहा पाय आणि तीस डोळे असून, तिचा रंग काजळासारखा काळा आहे. तिच्या हातात तलवार,बाण,गदा,शूल शंख,चक्र,परीघ धनुष्य इत्यादी आयुधे असून,रक्त ठिबकणारे राक्षसाचे मुंडकेही तिच्या हातात असते.तिची जीभ लाल असून, ती जीभ तिच्या तोंडाबाहेर लवलवत असते.
श्रीमहालक्ष्मी ही रजोगुणी देवता महिषासुराच्या वधासाठी अवतार घेती झाली.हिला अठरा हात असून रूद्राक्षमाळ,कमळ,बाण खड.ग,वज्र,गदा चक्र, त्रिशुळ,शंख,घंटा, पाप,शक्तिदंड,ढाल,धनुष्य,पानपात्र आणि कमंडलू अशा वास्तू तिच्या हातात असतात.तिचे मुख गोरे, हात निळे,कंबर व पाय लाल रंगाचे असतात.
श्रीमहासरस्वती सत्त्वगुणी असून ती गौरीच्या देहापासून, शुंभासुराला मारण्यासाठी उत्पन्न झाली.ती अष्टभुजा असून, तिच्या हातात बाण, मुसळ, शुल, चक्र,शंख,घंटा,नांगर आणि धनुष्य ही आयुधे असतात.
आश्विन सुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत होणारे शारदीय नवरात्र हा एक नवमीपर्यंत होणारे शारदीय नवरात्र हा एक कौटुंबिक कुळधर्म, कुळाचार, आहे. शारदीय नवरात्राला दुर्गादेवीचे नवरात्र मानतात. नवरात्रात दुर्गापूजा नित्य करावयाची असते. देवी पुजनात्मक हे शारदीय नवरात्र जसे नित्य आहे.
नवरात्र म्हणजे नऊ दिवस किंवा नऊ माळा असे सर्वच गृहित धरले जाते. परंतु प्रत्यक्षात ते तसे नसून तिथीचा क्षय आणि वृध्दी यामुळे कधी 8 किंवा 10 दिवस नवरात्र असते. नऊ दिवस किंवा रात्रीचा कुळाचार,असा या शब्दाचा अर्थ नाही,तर आश्विन शुध्द प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला ऊदद्ेशून करावयाचे कर्म म्हणजे नवरात्र होय.
शारदीय नवरात्रात घटस्थापना हा मुख्य विधी असतो. एक मातीची वेदी (ओटी) करतात आणि त्यावर घट स्थापन करून त्या घटाखालील नव्वान्ने (नऊ धान्य) पेरतात. शेजारी अखंड नंदादीप तेवत ठेवतात. नंदादीप हे ज्ञानमयी देवीचे घर पुष्पमाला मानवी जीवन सुत्राचे बिजारोहण नवनिर्मितीचे प्रतिक आहे. त्या घटावरील पात्रात आपल्या कुलदेवतेची मुर्ती ठेवतात. नवरात्र ऊठेपर्यंत दररोज तिची षोडपचारे पूजा करतात. तिच्यावर रोज एक याप्रमाणे झेंडूच्या किंवा तिळाच्या फुलांच्या माळा सोडतात.
काही ठिकाणी घटस्थापनेसाठी मातीची देवी तयार करत नाही तर घरातल्या देव्हार्यातील कुळधर्माचे टाक किंवा काही ठिकाणी ताम्हणात केवळ हळकुंंड, सुपारी मांडून त्याचीच दररोज षोडशोपचारे पूजा करतात. घटावरील पात्रात स्थापन केलेल्या कुलदेवतेचे पूजन प्रातःकाली, माध्यन्हाकाली व प्रदोष काली या प्रमाणे तीनदा, दोनदा किंवा एकदाच केले जाते. त्याप्रमाणे 9 दिवस सप्तशक्तीचा पाठ, अष्टमी अगर नवमीला हवन, ऊपवास, नक्त किंवा एकभुक्त इत्यादी नियम, सुवासिनी, कु मारिका पूजन, भोजन इत्यादी धार्मिक कृत्ये केली जातात. नऊ दिवस अखंड दीपाची स्थापना करतात व तो सतत तेवत राहील अशी दक्षता घेतात. नवरात्राच्या 9 दिवसात वर सांगितलेल्या कर्माचा समुच्चय अथवा विकल्प यांची व्यवस्था कूलाचाराप्रामणे करावी. आश्विन, शुध्द पंचमीला ललिताव्रत नावाचे व्रत करतात. ते स्त्रीर्पुरूष दोघांनाही करता येते. ललितापंचमीची पूजा म्हणून ही प्रसिध्द आहेत. काही ठिकाणी ही पूजा सकाळी तर काही ठिकाणी सायंकाळी करण्याचा परिपाठ आहे.
अशी करतात घटस्थापना
नवरात्र म्हटले की देवीची आराधना आणि व्रतांची आठवण होते. दरवर्षी येणारा नवरात्रीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी त्याविषयी किमान माहिती असायला हवी. यंदा ७ ऑक्टोबर रोजी आश्विन शुल्क पक्ष प्रतिपदेला घटांची स्थापना होणार आहे. यावर्षीचा मुहूर्त, देवीचे व्रत कसे करावे याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या नऊ रात्री देवीपुढे अखंड दीप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रांची पारायणं केली जातात. महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देशभरातून भक्त या देवींच्या दर्शनासाठी येतात. देवीला साडी-चोळी, पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात आणि आपले जीवन सुरळीत व्हावे यासाठी वरदान मागतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते.
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत. नवरात्रात अनेक कुटुंबांमध्येही व्रत केले जाते. यामध्ये कुलाचाराने देवीची पूजा केली जाते. अनेक घरांत कुलाचार असतो. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीप प्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.
नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा आहारात समावेश करावा. देवीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. अनेक जण 9 दिवस उपवास करतात त्यांनीही आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी ‘नऊ’ या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.) कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती व भजन करून देवीचे चिंतन करावे
घट बसवताना
1. नवरात्रमहोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील माती आणून तिचा दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात (पाच किंवा) सप्तधान्ये घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे इ.
2. मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात.
3. सप्तधान्ये आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी.
4. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रोत्सव साजरा करावा.
देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत
1. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
2. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
3. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली अध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.
4. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
5. देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.
II श्री देवीची आरती II
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
II श्री नवरात्री देवीची आरती II
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो
उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||
अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र – जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो
ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||
द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो
उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ ||
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो
अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||
चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो
उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो
भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो
अर्ध पाद्य पूजेने तुजला भवानी स्तवती हो
रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो
आनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ ||
षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो
घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||
सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो
तेथे तु नांदशी भोवती पुष्पे नानापरी हो
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडता झेलुन घेशी वरचेवरी हो || ७ ||
अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||
नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो
सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणा तृप्तता केले कृपे करुनी हो || ९ ||
दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो
सिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो
शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||
अखंड ज्योत
शास्त्रांनुसार, नवरात्रीच्या पूजनात अखंड दीप प्रज्वलित करण्याला विशेष महत्त्व आहे. अखंड दीप प्रज्वलन म्हणजे एकदा घटस्थापनेच्या दिवशी दीप प्रज्वलित केला की, नवरात्राची सांगता होईपर्यंत तो दीप अखंडपणे तेवत राहणे अत्यावश्यक असते. एखाद्या व्यक्तींने संकल्प करून संपूर्ण नवरात्र अखंड दीप प्रज्वलित ठेवला, तर देवी सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवीच्या आशीर्वादामुळे जीवन सदैव प्रकाशमान राहते. सर्व समस्यांतून मुक्तीचा मार्ग आपोआप दिसू लागतो, असे म्हटले जाते.
सात प्रकारचे धान्य
घटस्थापना करताना सात प्रकारच्या धान्याची आवश्यकता असते. याला सप्तधान्य असेही म्हटले जाते. या सप्तधान्यात जव, तीळ, धान, मूग, बाजरी, चणे, गहू यांचा समावेश केला जातो. याशिवाय नवरात्रातील पूजेत विड्याच्या पानालाही महत्त्व असते. कलशात ठेवण्याची विड्याच्या पानांचा वापर केला जातो. तेव्हाच कलशाची म्हणजचे घटस्थापना पूर्णत्वास जाते, असे म्हटले जाते. यामुळे घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते आणि शुभफलप्राप्ती होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
(टीपःया लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/सामग्रीची अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी ‘अधोरेखित’ देत नाही.ही माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/विश्वास /धर्मग्रंथांमधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे.आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे,त्याच्या वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी.याव्यतिरिक्त, वापरकर्ता स्वतः त्याच्या कोणत्याही वापरासाठी जबाबदार असेल)