सांगली । कृष्णाकाठाला आधीच सापांची भीती आणि आता बहे परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने परिसरातील लोक दहशतीखाली आहेत.बिबट्याच्या वावरामुळे लोक शेतात जायला घाबरत आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांत कृष्णा नदीला आलेला महापूर,अतिवृष्टीनंतर नदीकाठच्या गावात,शिवारात सापांचे प्रमाण वाढले आहे.महापुरात वाहून आलेल्या सापांचा लोकवस्तीत तसेच शिवारात वावर वाढल्याने लोक आधीच काहीशा भीतीखाली राहत आहेत.साप,नाग,घोणस,मण्यार,फुरसे,धामण,टोळ या जातीचे साप दिसून येत आहेत.बहे,हुबालवाडी,खरातवाडी,तांबवे आदी कृष्णा नदीकाठच्या गावांत सापांचा वावर वाढला आहे.घोणस जातीचे साप परिसरात तसेच शेत शिवारात फारसे दिसत नव्हते.पण महापुरानंतर हे प्रमाण चांगलेच वाढले आहे.नागांचे प्रमाणही वाढले आहे.
त्यातच शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या अरविंद सदाशिव हुबाले (वय ४७) या शेतकऱ्यावर बिबट्याने शनिवारी हल्ल्याचा प्रयत्न केला.पण,शेतकऱ्याने प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने शेतकरी बचावला.कृष्णाकाठाला आधीच सापांची भीती आणि आता बहे परिसरात बिबट्याचा वावर यामुळे शेतकरी तसेच मजूरवर्ग शेतात जायला धजावत नाही.दररोज ‘मॉर्निंग वॉक’ साठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.पण,बिबट्याच्या परिसरातील वावराच्या चर्चेने ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे.बिबट्याच्या वावराची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.
कृष्णाकाठाला सध्या ऊसतोडी सुरू आहेत.ऊसपट्ट्यातच बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पिकांना पाणी पाजण्यासाठी रात्री-अपरात्री शेतात जावे लागत आहे.बिबट्याच्या वावराच्या चर्चेने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागत आहे.गेल्या काही दिवसांत सापांचे प्रमाण कमी झाल्याचे सर्पमित्र बजरंग शिरतोडे यांनी सांगितले.त्यातल्या त्यात ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.
सतर्क रहावे, सुरक्षेची काळजी घ्यावी
शेतकरी व ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी व सतर्क रहावे, सुरक्षेची काळजी घ्यावी, रात्री-अपरात्री व एकटे शेतात जाऊ नये,असे आवाहन करण्यात येत आहे.बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.