मुंबई । भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठीची पाच नावे जाहीर केली असून त्यात पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना संधी दिली आहे. एक परिपत्रक काढत या पाच नेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी या महिन्यात निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपकडून पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून निसटता पराभव झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह पाच जणांना संधी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपाकडून सावधरीत्या पावलं उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून विधानपरिषदेच्या यादीमध्ये जातीय समतोल राखल्याची चर्चा आहे. मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपकडून संधी दिली गेली आहे.
याअगोदर भाजपने १० नावांची यादी पाठवली होती. पण, त्यात या पाच जणांना संधी मिळाली आहे. विधान परिषदेच्या एका उमेदवारासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ५ जागा भाजप, २ शिंदेसेना तर २ जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे.
सध्या विधान परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे १०३ आमदार आहेत. तर भाजपाचे महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्याशिवाय इतर छोटे पक्ष ९ आणि अपक्ष १३ असं एकूण २०१ आमदारांचं पाठबळ महायुतीकडे आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे ३७, ठाकरे गट १५ आणि शरद पवार गट १३ आणि शेकाप व अपक्ष प्रत्येकी एक असे मिळून ६७, असं बलाबल आहे. त्यामुळे सध्याच्या गणितानुसार विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ आमदार निवडून येऊ शकतात.