1962 चे चीन युद्ध झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांच्या पुढाकाराने पु. ल.देशपांडे, वसंत कानेटकर, वसंत सबनीस, पु.भा. भावे, ग. दि.माडगूळकर या पाच लेखकांनी राज्य शासनाच्या निमंत्रणानुसार लेह-लडाख या रणभूमीचा दौरा केला. या दौऱ्यानंतर पु.ल.देशपांडे यांनी ‘शूरां मी वंदिले’ या नावाने 1 जानेवारी 1964 च्या किर्लोस्कर मासिकाच्या अंकात लेख लिहिला. हा लेख मौज प्रकाशनाने 2001 ला प्रकाशित केलेल्या ‘एक शून्य मी’ या पु.लं. च्या पुस्तकात समाविष्ट आहे.
या लेखात पु.लं.चे नेहमीचे हातखंडा प्रवासवर्णन तर आहेच पण लष्करी आणि नागरी जीवनाची सांधेजोड व्हावी असा आग्रह आहे. लेह – लडाखच्या राहुटीतला एक अधिकारी त्यांना म्हणाला, आपल्या देशात अजूनही जवान किंवा लष्करी अधिकारी यांचा असावा तितका आदर नाही. घरदार सोडून लष्करात गेलेल्या माणसांविषयी देशातल्या नागरिकाला सर्वोच्च आदर वाटला पाहिजे. त्याच्या कुटूंबियांविषयी अधिक आस्था हवी. त्याच्या मुला-बाळांच्या शिक्षणाविषयी, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना अधिक स्नेहभाव, किंबहुना अधिक सोयी मिळाल्या तरच लष्करात जाण हा या देशात मानाचा आणि अधिक आकर्षक व्यवसाय होईल. जवान सुटीवर जातात तेव्हा त्यांना शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. त्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती हव्यात. कुटूंबियांना सन्मानाची वागणूक हवी. पालकांना गावांत, समारंभात मानाचे स्थान द्या. लष्करी पेश्याविषयी आदर वाटेल असे वागा. पु.ल. लिहितात, इंग्लंड मध्ये खेड्यातील सैनिक लढाईसाठी जाताना गावात बँड वाजत राहतो. मार्गावर पुष्प वृष्टी होते.
या लेह- लडाख परिसराचा निरोप घेताना दुसरा एक अधिकारी म्हणाला, ‘लोकांना सांगा – म्हणावं, आम्ही खुशाल आहो. तुम्ही निर्धास्त रहा. पण दिवसांतून केव्हा तरी आमची आठवण करा. आमच्या माणसांपासून आम्ही फार दूर आहो अस आम्हाला वाटत नाही. शीख, मराठे, राजपूत, मल्याळी, तामिळी अश्या असंख्य भावंडांच्या मोठ्या कुटूंबात आम्ही आहोत. आमचं उत्तम चालल आहे. सैन्यातल्या लोकांच्या एकतेची ही भावना सैन्या बाहेरच्या लोकांनी वाढवली तर सैनिकांच्या त्या कष्टांना अर्थ राहील. पु.ल.देशपांडे यांनी हा लेख 1964 ला लिहिला. म्हणजे आता या लेखाला 57 वर्षे झाली. तरी आजही लष्करातील जवानांची हीच भूमिका आहे.
आम्ही इस्लामपूर परिसरातील बरेच मित्र लष्करातील जवानांसाठी वाचन – चळवळ चालवतो. या चळवळीची भूमिका अशी – भारतीय लष्करांच्या ग्रंथालयात बहुतांश ग्रंथ इंग्रजी अथवा हिंदीत आहेत. त्यामुळे मराठी जवानांना मराठी पुस्तके वाचायला मिळावीत ही आमची भूमिका. जवानांचे शिक्षण बारावी ते पदवी आणि वय 20 ते 35 गृहीत धरून आम्ही पुस्तके गोळा करतो. सुट्टीसाठी गावी आलेल्या प्रत्येक जवानाला आम्ही मराठीतील दर्जेदार 25 पुस्तके भेट देतो. हे जवान लष्कराच्या ग्रंथालयात ही पुस्तके जमा करतात. आम्ही दोन वर्षात 400 हुन अधिक जवानांमार्फत देशाच्या सीमांवरील ग्रंथालयात 10 लाख रुपयांहून अधिक किंमतीची पुस्तके पोहोच केली आहेत. फेसबुकवर वाचन चळवळीचे पान (Page) आहे. या पानांवर आमच्या सर्व उपक्रमांची नोंद आहे. या उपक्रमांच्या निमित्ताने आम्हा मित्रांची जवान व अधिकाऱ्यांसोबत चर्चा होते. आजही 57 वर्षानंतर देखील लष्करातील जवानांचा तोच सूर आहे. आम्ही चालवलेल्या चळवळीमुळे नागरी समाज आणि लष्करात भावबंध निर्माण करण्यात हळू हळू यश येते आहे. इस्लामपुरात डॉ. योगेश वाठारकर लष्करी जवानांवर विनामूल्य उपचार करतात. ज्येष्ठ नागरिकांचे निर्मल वधू-वर सूचक मंडळ जवानांसाठी वर नोंदणी शुल्क आकारत नाही. नावेखेडला निवृत्त जवान गावात येताच सवाद्य मिरवणूक काढली. शहर व परिसरात अनेक संस्थांनी 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला जवानांच्या हस्ते ध्वजवंदन केले. जायंटस सारख्या संस्थेने बुके नको बुक द्या ही मोहीम राबवून चळवळीला पुस्तकांची मदत केली. पु.लं. चा लेख आणि वाचन चळवळीचे काम आम्ही आपण सर्वाना एवढ्यासाठी सांगतोय की आपण प्रत्येकाने आपल्या गावांपासून सैनिकांचा सन्मान करायला सुरुवात करू.
मला वाटतंय हे करता येईल,
🌑 15 ऑगस्ट , 26 जानेवारी ध्वजवंदन सैनिक अथवा पालकांच्या हस्ते.
🌑 सैनिक ड्युटीवर जाताना ‘भारत माता की जय’ चा घोष करीत गावाच्या सीमेपर्यंत सर्वांनी येणे.
🌑 गाव पातळीवर प्रशासनाने सैनिकांच्या कामांना प्रथम प्राधान्य देणे.
🌑 शक्य असलेल्या सर्व ठिकाणी सैनिक व कुटूंबियांना जास्ती जास्त सवलतींचा लाभ देणे.
🌑 भारताचा तिरंगा वाऱ्यामुळे नव्हे तर सैनिकांच्या श्वासोच्छावासामुळे फडकतोय याची जाणीव आपण सर्वांच्या देहबोलीतून हवी.