थोडक्यात पण,महत्वाचे
✪ ग्रामीण राजकारण अडकले घर-वाडा,भावकीत
✪ विकासकामे विरुद्ध भ्रष्टाचार असा रंगणार कलगी तुरा
✪ मतांचा गट्टा असणाऱ्यांना कार्यकर्त्यांना येणार सोन्याचा भाव
✪ गावा-गावात अन् चौका-चौकात रंगल्या चर्चा
✪ सावधान ! ते येत आहेत…पण,चोर पावलांनी
सांगली । निवडणुका जाहीर झाल्यानंतर गावोगावचे पुढारी एकदम रिचार्ज झाले आहेत.व लगेच कामालाही लागले आहेत.कार्यकर्त्यांशी गाठीभेटींचा सिलसिला सुरु केला आहे.कार्यकर्त्यांना आता महत्व आले आहे.कार्यकर्त्यांची मनधरणी सुरु झाली आहे.कार्यकर्त्यांसाठी घोषणांचा पाऊस सुरु झाला आहे.नोकरीची आश्वासने तसेच पॅकेजची आमिषे दाखवली जात आहेत.विकासकामे विरुद्ध भ्रष्टाचार असा प्रचाराचा कलगी तुरा आता रंगणार आहे.आतापासूनच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागल्या आहेत.मतांचा गट्टा असणाऱ्यांना कार्यकर्त्यांना आता सोन्याचा भाव येणार आहे.अशा कार्यकर्त्यांना पटवण्यात राजकारणी कसे यशस्वी होतात यावरच यश-अपयशाची गणिते अवलंबून असणार आहेत.एकूणच आता पडद्यामागच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यापासून ग्रामपंचायत निवडणुकांबाबत उलटसुलट चर्चा होती.आधी ग्रामपंचायती की जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार याची चर्चा ग्रामीण भागात रंगली होती.पण जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्या आहेत.त्यातच निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने यावर अखेर पडदा पडला आहे.परंपरेनुसार प्राधान्याने जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुका आधी होत असत.त्यावर गावोगावची ग्रामपंचायतींची राजकीय समीकरणे अवलंबून असत.त्यानुसार गावोगावी गट-तटांची बांधणी होत होती.पण,आता याउलट समीकरणे होणार असल्याने जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या इच्छुकांच्या अडचणी होणार आहेत.
चौका-चौकात रंगल्या चर्चा
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली.आणि गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकांची चर्चा सुरु झाली आहे.चौका-चौकात,कट्ट्यावर लोकं याबाबत चर्चा करताना दिसत होते.आतापर्यंत कार्यकर्त्यांच्या पातळीवर सुरु असलेली चर्चा मतदारांपर्यंत पोहोचली आहे.ग्रामीण भागातील मतदारांची मनधरणी करताना आता पुढाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या.तसा ग्रामीण राजकारणाने वेग घेतला आहे.राजकारण तापू लागले आहे.गावपुढाऱ्यांची मतदारांवर प्रभाव असणारे कार्यकर्ते मिळविण्यासाठी धावाधाव सुरु आहे.खुले सरपंचपद असलेल्या ठिकाणी अत्यंत चुरशीने निवडणुका होणार आहेत.या ठिकाणी काट्याची टक्कर अपेक्षित आहे.सरपंच पदाबरोबरच सदस्यपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
थेट सरपंच पदामुळे निर्णयांची सारी सूत्रे सरपंचांच्या हातात राहणार असल्यामुळे प्रत्येक गटाचे सरपंच पदाचा उमेदवार हे पहिले टार्गेट असणार आहे.पॅनलप्रमुखांना सरपंच पदाचा उमेदवार निवडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.उमेदवार हा जनतेच्या पसंतीस उतरणारा आणि महत्वाचे म्हणजे तो आपल्या मर्जीतील असा महत्वाचा निकष महत्वपूर्ण ठरणार आहे.खुल्या प्रवर्गातील सरपंच पदासाठी पॅनलप्रमुखांपैकी कोणातरी एकाला संधी मिळणार हे उघड गुपित आहे.याठिकाणी कारण सत्तेच्या चाव्या कोणीही दुसऱ्याच्या हातात देणार नाही हे वास्तव आहे.कारण केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना मिळत असतो.
ग्रामीण राजकारण अडकले घर-वाडा,भावकीत
ग्रामीण राजकारण आजही ‘घर-वाडा आणि भावकी’च्या परिघातच अडकले आहे.उमेदवारी निश्चित करताना हा ‘फॅक्टर’ ग्रामीण भागात आजही महत्वाचा मानला जातो.त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारी निश्चित करताना घर-वाडा आणि भावकी ठरवेल त्याला उमेदवारी हा निकषही महत्वाचा असतो.अशावेळी संबंधित वाडा किंवा भावकी ज्याला उमेदवारी निश्चित करेल तो उमेदवार फायनल होतो.मग तो त्या पदाला लायक असो वा नसो हे बघितले जात नाही.त्यामुळे ठराविक लोकांना पुन्हा-पुन्हा संधी मिळत आहे.काही ठिकाणी दबावाने उमेदवाऱ्या निश्चित होतात अशी अनेक उदाहरणे ग्रामीण राजकारणात यापूर्वी घडली आहेत.ग्रामीण राजकारण घर-वाडा,भावकीच्या परिघात अडकल्याने अनेक होतकरू आणि कामाची धमक असतानाही अनेकांना संधी मिळत नाही.गावाच्या विकासाला प्राधान्य मिळण्याऐवजी घर-वाडा आणि भावकीच्या राजकारणामुळे अनेक ठिकाणी गावाच्या विकासाला खो बसत असल्याचे चित्र आहे.घर-वाडा,भावकी अशी रणनीती आखून राजकारण होत असल्यामुळे अनेक कर्तृत्ववान लोकांना अशा प्रक्रियेपासून दूर रहावे लागत आहे.घर-वाडा आणि भावकीच्या परीघाबाहेर जावून राजकारण करणारी काही गावे विकासाच्याबाबतीत शहरांशी बरोबरी करू लागली आहेत.त्यामुळे घर-वाडा आणि भावकी या परिघाच्या बाहेर पडून होतकरू आणि कामाची धमक असणाऱ्यांना पुढे करून राजकारण झाल्यास खऱ्या अर्थाने गावाच्या विकासाची पहाट नव्याने उजाडणार आहे.नाहीतर गावगुंडी राजकारणामुळे काही गावांमध्ये विकासाच्या नावाने शंखच आहे.