Last Updated on 17 Oct 2022 5:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पंतप्रधानांनी केले 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन
‘प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना – ‘एक राष्ट्र एक खत’ चा शुभारंभ
नवी दिल्ली । मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट दिली असून किसान सन्मानचा 12 वा हप्ता आज बँक खात्यात जमा केला.पंतप्रधानांनी केलेल्या एका क्लिकनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ही रक्कम जमा झाली.पंतप्रधान मोदी यांनी 16 हजार कोटींचा PM-KISAN निधी जारी केला आहे. PM-KISAN अंतर्गत आत्तापर्यंत २ लाख कोटी रुपये वितरीत केले आहेत.पंतप्रधानांनी रसायने आणि खते मंत्रालयांतर्गत 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचेही (पीएमकेएसके) उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी ‘इंडियन एज’ हे खतावरील ई-मासिकही प्रकाशित केले. मोदींनी स्टार्टअप प्रदर्शनाच्या संकल्पना पॅव्हेलियनचा आढावा घेतला आणि प्रदर्शनातील उत्पादनांची पाहणी केली.

जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान (संशोधन) हे मंत्र एकाच प्रांगणात उपस्थित असल्याचे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. या मंत्राचे जिवंत रूप आपण येथे पाहू शकतो. किसान संमेलन हे शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करणे, त्यांची क्षमता वाढवणे आणि प्रगत कृषी तंत्राला चालना देणारे साधन आहे. “आज 600 हून अधिक प्रधानमंत्री समृद्धी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे” असे मोदी म्हणाले. ही केंद्रे केवळ खत विक्री केंद्रे नसून देशातील शेतकऱ्यांशी घट्ट नाते निर्माण करणारी यंत्रणा आहे असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या (पीएम-किसान) नव्या हप्त्याबाबत, पंतप्रधान म्हणाले की, पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतात.
“कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना 16,000 कोटी रुपयांचा आणखी एक हप्ताही पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपात जारी करण्यात आला आहे” असे सांगत दिवाळीच्या आधी हा हप्ता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना – एक राष्ट्र एक खत आज सुरू केली आहे. भारत ब्रँडचे स्वस्त दर्जाचे खत शेतकऱ्यांना मिळण्याची सुनिश्चिती करणारी ही योजना आहे असे पंतप्रधान म्हणाले.
केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाले की,कृषी क्षेत्रातल्या संशोधन कार्याला प्रोत्साहन देण्यात आल्यामुळे, नॅनो युरियाचे व्यावसायिक उत्पादन सुरू करणारा भारत जगातला पहिला देश बनला आहे. ते म्हणाले की, 600 किसान समृद्धी केंद्र शेतकरी बांधवांना अनेक प्रकारे, अनेक मार्गांनी बळकट करतील.
प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र (पीएमकेएसके) देशातल्या शेतकरी बांधवांच्या गरजा पूर्ण करतील आणि माती, बियाणे आणि खतांच्या परीक्षणाच्या सुविधेसह शेतीसाठी लागणारी मदत (खते, बियाणे,कृषी अवजारे) पुरवतील. या समृद्धी केंद्रांमुळे शेतकरी बांधवांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठीही मदत होईल. अशी माहिती मांडवीया यांनी दिली.











































































