सांगली । दुसऱ्यासारखे दिसण्यासाठी त्याच्या वेषभूषा,केशभूषेचे अनुकरण करू नका. कारण ते कृत्रिम आहे, नकली आहे. त्यापेक्षा संतांच्या,चांगल्या माणसांच्या विचारांचे अनुसरण करा.आपण जीवनात यशस्वी व्हाल, तुमच्या जीवनाचे कल्याण होईल, असा विश्वास सुप्रसिध्द कीर्तनकार विशाल खोले महाराज (मुक्ताईनगर) यांनी राजारामनगर येथील कीर्तनकार सन्मान व कीर्तन सोहळ्यात बोलताना व्यक्त केला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या संकल्पने तून १२५ किर्तनकारांचा सन्मान व कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे,राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, ह.भ.प.पांडुरंग तांगडे पाटील (संभाजीनगर), नागेश फाटे (पंढरपूर),पै.धनपाल खोत प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती व स्व.बापूंच्या प्रतिमेचे पूजन,तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले.
विशाल महाराज पुढे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकोबांचे भजन जमिनीवर बसून ऐकले. आज जयंतराव पाटीलसाहेब,आणि प्रतिकदादा या बाप लेकाने समोर मांडी घालून बसत कीर्तन ऐकले. हा स्व.बापूंनी केलेल्या शुध्द संस्कारा चा भाग आहे. भगवंतावर विश्वास ठेवा. कितीही मोठे संकटे येऊ द्या, तो तुम्हाला वाट दाखवेल. आपल्या पूर्वजांनी किड्या-मुंग्यांना देव मानले. मात्र सध्या रस्त्यावर माणसं किड्या-मुंग्यासारखी मरत आहेत. कोणाला पहायला वेळ नाही. पूर्वी आपल्या बापाने हाक मारल्यानंतर बैलही पळत येत होता. मात्र आता बाप किती ओरडला,तरी पोरं लक्ष देत नाहीत,ही शोकांतिका आहे.
प्रा.लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले,बापूंनी ग्रामीण भागात शाळा सुरू करून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्य माणूस उभा केला,तर पदयात्रा काढून सामान्य माणसांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले. त्यांनी मंत्री म्हणून केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही.
यावेळी गायनाचार्य ओमकार जगताप, कुंदन बोरसे,सदानंद कडोले गुरुजी,मृदुंगचार्य विकास बेलुकर,संजुबाबा सातारा,तसेच ह.भ.प.भानुदास कोल्हापूरे इस्लामपूर,राजेंद्र चव्हाण नवेखेड,दीपक पाटील येडेनिपाणी, दिगंबर यादव बावची,ईश्वरा सुतार बुर्ली यांच्यासह कार्यक्षेत्रातील १२५ किर्तनकारांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान प्रा.ढोबळे आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर.पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,प्रा.शामराव पाटील, नेताजी राव पाटील,अँड.चिमणभाऊ डांगे, बाळासाहेब पाटील,दादासाहेब पाटील, भास्करराव पाटील यांच्यासह राजारामबापू समूहातील मान्यवर,स्त्री-पुरुष व युवा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी राजारामबापू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक अतुल पाटील यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्र संचालन केले.
Recent Posts
बातमी शेअर करा : कोजागरी पौर्णिमा सोमवार दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रात्री – लक्ष्मी व इंद्रपूजन मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर 2025 दिवसा नवान्न प्राशन व ज्येष्ठ आपत्यास ओवाळणे मम सकल -अलक्ष्मी... Read more