काही पतसंस्था बनल्या सावकारीचा अड्डा; सहकार विभागाकडून अंकुश आवश्यक
■ काही पतसंस्थांत केली जाते बेकायदा व्याजाची आकारणी.त्याचा फटका कर्जदाराला
■ कर्जप्रकरणांत कोरे धनादेश कर्जदाराकडून घेणे बेकायदेशीर. तरीही सक्ती केली जाते
■ नियमांना बगल देऊन केली जाते कर्जवसुली निकष धुडकावून राबविली जाते जप्तीची मोहीम
■ काही पतसंस्थांना सहकार विभागाचेच अभय
■ काही पतसंस्थांमध्ये ठेवली जातात दोन प्रकारची रिकॉर्डस्’
पुणे : (अधोरेखित.कॉम)
संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे काही पतसंस्था अडचणीत आल्या आहेत.काही पतसंस्थांच्या मनमानी धोरणामुळे कर्जदार बेहाल झाले आहेत. काही पतसंस्थांमध्ये व्याजाची पठाणी पद्धतीने आकारणी केली जात आहे.सावकारी परवडली;पण पतसंस्थांचे कर्ज नको,अशी म्हणण्याची वेळ काही पतसंस्थांच्याबाबतीत कर्जदारांवर आली आहे.
गेल्या आठ-दहा वर्षात काही पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचे चित्र आहे.अगदी पुण्यापासून ते धुळ्यापर्यंत जाऊन पोहोचलेल्या इस्लामपूर येथील एक पतसंस्थेतील घोटाळा थक करणारा होता. बनावट नावाने कर्जप्रकरणे करून कोणतेही तारण न घेता लाखो रुपयांची रकम हडप करण्याचा धक्कादायक प्रकारही या पतसंस्थेत घडला होता.बनावट नावाने कर्जप्रकरणे करून कोणतेही तारण न घेता लाखो रुपयांची रक्कम हडप करण्याचा धक्कादाय प्रकारही या पतसंस्थेत घडला होता.
राज्यात पतसंस्थांचे घोटाळे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात उघडकीस येवू लागले आहेत. अधिकाराच्या बाहेर जावून गंभीर बाबी घडविणे, कर्मचारी वर्गाला हाताशी धरून ठेवींची वारेमाप पद्धतीने उधळण केल्याने काही पतसंस्था बुडल्या आहेत. लाखो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अशा पतसंस्थांमध्ये अडकले आहेत.एका बाजूला संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे संस्था अडचणीत जात आहेत. दुसऱ्या बाजूला कर्जदारांना अडचणीत आणण्याचा उद्योग काही पतसंस्था चालकांकडून सुरू आहे. भरमसाठ व्याज आकारणीमुळे काही कर्जदार चांगलेच गोत्यात येत आहेत.मुदलात व्याज मिसळणे,मुद्दल आणि व्याज एकत्र करून त्यावर पुन्हा व्याजाची आकारणी करणे असे प्रकार यापूर्वी झाले आहेत.आजही काही पतसंस्थांत सुरू आहेत.
सध्या कर्जदाराकडून बेहिशेबी दंड व्याज वसूल करण्याचे फॅडच आले आहे.दरम्यान, पतसंस्थांच्या मनमानीला सहकार विभागातीलच काही अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. सहकारी संस्थांच्या बेकायदेशीर कामावर अंकुश ठेवणे हा मुख्य उद्देश सहकार विभागाचा असताना काही अधिकारी मात्र अशा पतसंस्थांना पाठीशी घालत आहेत.१०१ चे दाखले देताना कायदे मोडून कोणत्याही प्रकारे व्याज योग्य आहे की नाही याची पडताळणी न करता बँका पतसंस्था सांगतील त्याप्रमाणे त्या रक्कमेचा दाखला देण्याचे बेकायदेशीर कृत्य काहींकडून होत असल्याचे सांगितले जाते.
कर्जदारांकडून तारण म्हणून कोरे धनादेश स्वीकारणे हे बेकायदेशीर असतानाही बहुसंख्य पतसंस्था कर्ज देतेवेळी असे धनादेश घेत आहेत. वसुली अधिकाऱ्यास कर्जदाराच्या घरातील साहित्य उचलून आणण्याचा अधिकार नाही तरीही बेकायदेशीरपणे हे काम सुरू आहे. जप्त केलेल्या मालमत्तेचा ताबा घेणेसुद्धा बेकायदेशीर ठरते.लिलावानंतरच कर्जदाराकडून याचा ताबा घेता येतो.तोपर्यंत कर्जदारास त्या मालमत्तेपासून वंचित ठेवता येत नाही तरीही असे प्रकार सुरू आहेत.काही पतसंस्था या सावकारीचा अड्डा बनल्या असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान मनमानी पद्धतीने काही पतसंस्थांमध्ये व्याजाची आकारणी सुरू आहे. वसुलीसाठी भरमसाठ व्याज आकारणी करून कर्जदारांना अडचणीत आणणाऱ्या पतसंस्थांच्या संचालक मंडळावर तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सहकार विभागाने कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. पठाणी पद्धतीने व्याज आकारणी करून वसुलीसाठी धाकदपटशा दाखविण्याचे प्रकारही दिवसेंदिवस वाढीस लागले आहेत. यामुळे काही कर्जदार देशोधडीला लागले आहेत. काही पतसंस्थांमध्ये दोन प्रकारची रिकॉर्डस्’ ठेवली जात आहेत.अशा रेकॉर्डसच्या माध्यमातून काही पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवहार होत आहेत. त्यांचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.