पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा
नवी दिल्ली । केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि पीव्ही नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे.शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर याची घोषणा केली.यापूर्वी हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले,’चौधरी चरण सिंह यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाला हा पुरस्कार समर्पित करत आहोत.त्यांनी शेतकऱ्यांचे अधिकार आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो किंवा देशाचे गृहमंत्री किंवा साधे आमदार असतानाही त्यांनी केवळ राष्ट्र निर्माणाला महत्त्व दिले.आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी ठाम भूमिका घेतली होती.आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांची समर्पण वृत्ती आणि आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाही वाचविण्यासाठी दाखविलेली तत्परता आम्हाला कायम प्रेरणा देत राहिल.’
काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव यांना देखील भारतरत्न जाहीर झाला आहे.नरसिंह राव हे प्रतिष्ठित विद्वान आणि राजकीय नेते होते.त्यांनी भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री आणि खासदार ते पंतप्रधान म्हणून काम केल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वामुळे भारताला आर्थिक बाबतीत प्रगतीच्या मार्गावर जाता आले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
हरित क्रांतीचे जनक आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,’कृषी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करत असताना मनस्वी आनंद वाटत आहे.अतिशय आव्हानात्मक काळात स्वामीनाथन यांनी भारतीय कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यात मोलाची भूमिका वठवली.तसेच भारतीय कृषी क्षेत्राला आधुनिकतेकडे नेण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.’
दरम्यान, यंदा केंद्र सरकारने पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केले आहेत.यामध्ये बिहारमधील नेते जननायक कर्पुरी ठाकूर,भाजप नेते लालकृष्ण अडवाणी,माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह,माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. लालकृष्ण अडवाणी वगळता इतरांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला आहे.