सांगली । वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे साद माणुसकीची सेवाभावी संस्थेच्यावतीने विलासगड उर्फ मल्लिकार्जुन डोंगरावर सलग तिसऱ्या वर्षी वृक्ष लागवडीची हॅट ट्रिक करण्यात आली.
विलासगडाच्या पायथ्याशी 100 हुन अधिक कार्यकर्ते आज सकाळी साडेसहा वाजता जमा झाले.पायथ्यापासून लिंब,चिंच,आंबे ही रोपे अंगा खांद्यावर मिरवत डोंगराची चढण चढून कार्यकर्ते डोंगर माथ्यावर पोहचले. केतनराज अकादमीच्या विद्यार्थ्यांनी शाळा सुटताना तहान भूक हरली रे विठ्ठल नामाची शाळा भरली अशा अभंगावर ठेका धरला.रियाझ मोमीन यांनी वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले.
हेही वाचा : तब्बल 28 वर्षांनी एकत्र आलेल्या सवंगड्यांनी घेतला ‘मैत्री बँक’ सुरू करण्याचा निर्णय
मल्लिकार्जुन देवाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच वृक्षरुपी अभिषेक घालण्यासाठी गोटखिंडीकर सरसावले.सलग तीन वर्षे लावलेली झाडे या लोकांनी जगवली आहेत.उन्हाळ्यात डोंगर माथ्यावर दर गुरुवारी जाऊन झाडे जगवणाऱ्या भीमराव मोरे व कृष्णात माळी यांचा सत्कार करण्यात आला.संतोषगिरी या दुसऱ्या डोंगरावर ही यापूर्वी वृक्ष लागवड केली आहे.
वृक्ष लागवड मोहिमेत साद माणुसकीची,केतनराज अकादमी,नृसिंह तरुण मंडळ,गोटखिंडी,जायंटस ग्रुप व जिव्हाळा ग्रुप इस्लामपूर या संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.रामचंद्र पाटील यांनी मोहिमेला देणगी दिली. झाड लावण्याबरोबरच जगवण्याचा गोटखिंडीकरांचा हा वृक्ष लागवड पॅटर्न स्तुत्य व अनुकरणीय आहे.