मुंबई । गरजा ओळखून त्याआधारे संशोधनाला प्राधान्य देण्याची गरज आहे. संशोधनातून देशात होणाऱ्या आयातीला पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त, स्वदेशी उपाय पुढे यायला हवेत. याच पार्श्वभूमीवर बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि बायो -मासपासून ग्रीन हायड्रोजनच्या (हरित इंधनाच्या) निर्मितीसाठी जैव-तंत्रज्ञानाच्या वापरावर संशोधन केंद्रित करावे,असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आयआयटीच्या संशोधकांना केले.आयआयटी मुंबई येथील शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटद्वारा आयोजित अलंकार-2022 या जागतिक नेतृत्व शिखर परिषदेत ते आज बोलत होते.
गरजा ओळखून त्या आधारे आपण संशोधनाला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे त्यांनी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना सांगितले. संशोधनातून आयातीला पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त, स्वदेशी उपाय पुढे यायला यावेत असे ते म्हणाले. आपल्याला देशात आयात केल्या जाणाऱ्या वस्तू ओळखण्याची गरज आहे आणि त्यानंतर त्यांच्यासाठी स्वदेशी पर्याय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशात आयात केल्या जाणाऱ्या वस्तू ओळखून त्यांच्यासाठी स्वदेशी पर्याय विकसित करण्यावर भर देणे गरजेचे आहे. यामुळे आयात कमी होईल, निर्यात वाढेल आणि आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल असे ते म्हणाले. सर्व संशोधन प्रकल्पांसाठी सिद्ध तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता, कच्च्या मालाची उपलब्धता आणि विक्रीसाठीची योग्यता यांचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा असे ते म्हणाले.
देशातील 65 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून
जरी कृषी क्षेत्राचा जीडीपी केवळ 12 टक्के असला तरी देशातील 65 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे असे ते म्हणाले. देशात 124 जिल्हे आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे, मात्र ते सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आयआयटीच्या संशोधकांना या जिल्ह्यांमधील वन-आधारित उद्योग, कृषी आणि ग्रामीण तंत्रज्ञान, आदिवासी क्षेत्र यांना संशोधनात प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “आपल्याला क्रांती घडवून आणण्याची क्षमता असलेला ग्रामीण, कृषी संबंधी आवश्यक कच्चा माल ओळखण्याची गरज आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील”, असे ते म्हणाले.
भविष्यात ग्रीन हायड्रोजनचा वापर रसायने, खते, पोलाद सारख्या विविध उद्योगांमध्ये तसेच वाहतूक क्षेत्रातही केला जाईल, असे सांगून गडकरी यांनी देशातील तरुण, प्रतिभावान अभियांत्रिकी मनुष्यबळाला इलेक्ट्रोलायझिंगद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन निर्मितीवर संशोधन करण्याचे आवाहन केले.यामुळे देशातील नगरपालिकांना कचऱ्यातून संपत्ती निर्मिती बरोबरच स्वच्छ भारत अभियान राबविण्यास देखील मदत होईल असे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी नागपूर महानगरपालिकेचे उदाहरण दिले.त्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया केली आणि नंतर ते कोराडी आणि खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रातील वीज प्रकल्पांसाठी राज्य वीज उत्पादक महाजनकोला विकून कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करता येते ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणून दाखवली आहे. यातून वार्षिक 325 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होत आहे असे ते म्हणाले.
पर्यावरण आणि परिसंस्थेसाठी प्रदूषण ही एक मोठी चिंतेची बाब
आगामी काळात आपण ऊर्जा निर्यातदार देश बनले पाहिजे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी मोठे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले. ऊर्जा संकट ही आपली समस्या आहे, असे ते म्हणाले. देशाच्या ऊर्जा निर्मितीत सौरऊर्जेचा 38 टक्के वाटा आहे आणि हा वाटा वाढवला जात असताना,जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत आपण अजूनही औष्णिक उर्जा निर्मिती थांबवू शकत नाही, असेही ते म्हणाले. मात्र, आपल्या पर्यावरण आणि परिसंस्थेसाठी प्रदूषण ही एक मोठी चिंतेची बाब आहे आणि आपला देश 16 लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. म्हणूनच हरित इंधनावर भर देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
आपल्या देशात ऊसाची मळी (मोलॅसिस), बी-हेवी मोलॅसिस, ऊस, तुकडा तांदूळ, बांबू, अन्नधान्य, कृषी-कचरा यांपासून हरित हायड्रोजन निर्मिती करता येते.आसाममध्ये बांबूपासून इथेनॉल तयार करण्याचा प्रकल्प सुरू झाला आहे,पानिपतमधील आयओसीएल प्रकल्प भाताच्या पेंढ्यापासून (किंवा हिंदीत पराली) जे हिवाळ्यात दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हवा प्रदूषित होण्याचे मुख्य कारण आहे, त्यापासून दररोज 150 टन बायो-बिटुमेन तयार करतो, या प्रकल्पातून 1 लाख लिटर बायो-इथेनॉलची निर्मिती देखील होत आहे. याशिवाय आयओसीएल प्रकल्पात 5 टन परालीपासून 1 टन बायो-सीएनजी तयार होतो अशी माहिती गडकरी यांनी दिली. या संदर्भात ते म्हणाले, पाणी, वीज, वाहतूक, दळणवळण या उद्योगांसाठीच्या मूलभूत गरजा आहेत, ज्यामुळे भांडवली गुंतवणूक आणि रोजगार निर्माण होईल. या संदर्भात ते म्हणाले, पाणी, वीज, वाहतूक, दळणवळण या उद्योगांसाठी मूलभूत गरजा आहेत, त्यातूनच भांडवली गुंतवणूक येईल आणि रोजगार निर्मिती होईल,असे गडकरी म्हणाले.
पर्यायी इंधनावर आधारित वाहतुकीबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, कंपन्या बायो-इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या मोटार-सायकल आणि स्कूटर बनवत आहेत. अलिकडे झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, इथेनॉल आणि पेट्रोल यांचे ‘मायलेज’ सारखेच असून दोन्ही इंधनावर गाडी तेवढेच अंतर चालते.मात्र इथेनॉलची किंमत 60 रुपये असून,ती पेट्रोलच्या तुलनेत बरीच कमी आहे,असेही ते म्हणाले.
संशोधन संस्थांनी आपण केलेले कार्य बंद दाराआड ठेवू नये, असे सांगून आपल्या संस्थेमध्ये झालेल्या कामाचे शोधनिबंध सार्वजनिक करावेत, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. यासाठी भागधारकांमधील सहकार्य, समन्वय आणि संवाद आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.