हवामान विभागाकडून वीजांच्या कडकडांसह जोराचा वारा, हलका मध्यम पाऊस तसेच वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवल्यास तसेच रेड अलर्ट जारी केला असल्यास खबरदारी घेणे महत्वाचे असते.
या गोष्टी करा…
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा.
जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या.
घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका…
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका.
शॉवरखाली अंघोळ करू नका.
घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका
कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
न दिसणाऱ्या विजेपासून सावधान!
वीज दिसत नाही, पण परिणाम मात्र जीवघेणे असतात. विजेपासून प्रामुख्याने पावसाळ्यात सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे तसेच पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने विविध दुर्घटना घडतात.त्यामुळे जीवितहानीचा धोका निर्माण होतो. तो टाळण्यासाठी सतर्कता हीच सुरक्षितता हाच सर्वोत्तम उपाय आहे.
वादळवाऱ्यामुळे वीजतारांमध्ये घर्षण होण्याची शक्यता असते.त्यामुळे विजेचे खांब, विजेच्या तारा व रोहित्रे यातून ठिणग्या पडत असतात अशावेळी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाला त्वरित कळवावे. कारण अशा ठिणग्यांतून वीजतारा तुटून किंवा आग लागून मोठी दुघर्टना घडण्याची शक्यता असते.