नवी दिल्ली । भारतानं तंत्रज्ञानात लोकशाही आणली असून कृषी, आरोग्य, शिक्षण अशा निरनिराळ्या क्षेत्रांत तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावू शकतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं आहे.मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
लोकांचा तंत्रज्ञानावरचा विश्वास दृढ करण्यासाठी समाजातल्याच उगवत्या प्रतिभेचं योगदान मिळवण्यावर सरकारचा भर असून सरकार त्यासाठी वचनबद्ध आहे, असंही ते म्हणाले. भारतातली मुलं लहानपणापासूनच आई आणि ए आय अर्थात कृत्रिम बुध्दीमत्ता असं दोन्हीही उच्चारायला शिकतात- असा उल्लेखही त्यांनी केला.
प्रशिक्षणाअभावी कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर होण्याचा धोका अधोरेखित करत,तिचा वापर आळशीपणासाठी करु नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
तंत्रज्ञान खेडोपाडी पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं त्यांनी सांगितलं. ड्रोन दीदींचा दाखला देत, भारतातल्या स्त्रिया अधिक मोकळेपणाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करतात असं पंतप्रधान म्हणाले.
आधुनिक तंत्रज्ञान क्रांतीसोबतच डेटा सुरक्षेवरही विचार करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली.डेटाचा योग्य वापर करण्याची खबरदारी घ्यायला हवी, असं ते म्हणाले.भारतात कायमच नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं सांगत चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत अग्रेसर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या भेटीत उभय नेत्यांनी अनेक विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली.नवीकरणक्षम ऊर्जासाधनांबाबत भारत वेगानं प्रगती साधत आहे, हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात झेप घेण्यासाठी भारत उत्सुक आहे, असं सूतोवाच पंतप्रधानांनी केलं. गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी सर्व मुलींना लस देण्याचा मनोदय व्यक्त करत, या क्षेत्रात स्थानिक संशोधनासाठी सरकार निधी उपलब्ध करून देणार असल्याचं ते म्हणाले.