सांगली । वाळवा तालुक्यासह मिरज पश्चिम भागातील ८ गावातील जनतेच्या आरोग्यासाठी दीड महिना अथक काम केल्यानंतर युवा नेते व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी आता वाळवा तालुक्यातील क्षारपड जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘समृध्द भूमी अभियान’हाती घेतले आहे.बुधवार दि.२१ फेब्रुवारीपासून ते वाळवा तालुक्याचा दौरा सुरू करीत आहेत.माती परीक्षण,जमिनीची जैविक सुपीकता सुधारणा,पाचट व पाचटाचे महत्व आणि सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली आदीबाबत प्रतिकदादा पाटील शेतकऱ्यांशी संवाद साधत चर्चा करणार आहेत. ‘संकल्प कृषीक्रांतीचा, मातीच्या सुपीकतेचा’हे अभियानाचे घोषवाक्य आहे.
बुधवार दि.२१ रोजी सकाळी १० वाजता बोरगाव येथे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविली असून या बैठकीमध्ये बोरगावसह बनेवाडी,मसुचीवाडी साटपेवाडी, जुनेखेड,नवेखेड येथील शेतकरीही सहभागी होणार आहेत. तर सायंकाळी ६ वाजता साखराळे येथे आयोजित बैठकीमध्ये साखराळेसह खरातवाडी,हुबालवाडी येथील शेतकरी सहभागी होणार आहेत.
गुरुवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता नरसिंहपूर येथील बैठकीत नरसिंहपूर,शिरटे येथील शेतकरी सहभागी होणार आहेत. तर सायंकाळी ६ वाजता तांबवे येथे आयोजित बैठकीत तांबवे,धोत्रेवाडी,येवलेवाडी येथील शेतकरी सहभागी होणार आहेत.शुक्रवार दि.२३ रोजी सकाळी १० वाजता नेर्ले येथे,तर सायंकाळी ६ वाजता कासेगाव येथे बैठक होणार आहे.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना हे अभियान राबवित आहे. क्षारपड जमीन सुधारण्यासाठी लोकनेते राजारामबापू पाटील सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजना राबविली जात आहे.यामध्ये एकरी ८० हजार रुपये खर्चापैकी शेतकऱ्यांनी रुपये १० हजार भरायचे असून ७० हजार रुपयांचे अर्थसहाय्य अल्प प्रक्रियेत बँकांच्याकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे.या दौऱ्यात शेतकऱ्यांना माहिती देताना त्यांचे मते जाणून घेतली जाणार आहे.
आ.जयंतराव पाटील यांनी पूर्वी क्षारपड जमीन सुधारण्यासाठी चर खुदाईसारखा प्रकल्प राबविला आहे. त्यानंतर त्यांनी राज्याच्या जलसंपदा मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना वाळवा व मिरज तालुक्यातील काही गावात राज्य शासनाच्या वतीने ८०-२० ही योजना आणली आहे.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील,जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,ऊस विकास अधिकारी सुजय पाटीलजलसिंचन अधिकारी जे.बी.पाटील आणि बँकांचे प्रतिनिधी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.
‘वर्षपूर्ती’त प्रतिकदादांनी उभा केला कामांचा डोंगर!
युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी १७ फेब्रुवारी २३ रोजी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली असून आज (शनिवारी) त्याच्या अध्यक्ष पदाची वर्षपूर्ती होत आहे. त्यांनी या एका वर्षाच्या कारकिर्दीत शेतकरी व कामगारांच्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रम राबविले आहेत. सर्वांच्याकडून त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.