सांगली । मी माझ्या भावाशी,मित्राशी २५ वर्षे बोलत नाही,हे सांगण्यात कसला आला आहे,अभिमान? जीवन अगदीच बेभरवशाचे झाले आहे.अहंकार सोडा,झाले-गेले विसरून माफ करायला शिका. नाती जपा,असा संदेश प्रसिध्द वक्ते युवराज पाटील (गारगोटी) यांनी साखराळे येथील वसंत व्याख्यानमालेत बोलताना दिला.
जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ४० व्या वसंत व्याख्यानमालेत ‘चला,नाती जपुया’या विषयावर ते बोलत होते. तनिष्का फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाहीर अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी स्व.वसंतदादा पाटील,लोकनेते राजारामबापू पाटील,स्व.शामरावअण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. माजी सभापती आनंदराव पाटील, जवाहर वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील,ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, सोनहिराचे मुख्य अभियंता सयाजी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नरसिंहपूर हायस्कुलचे मुख्याध्यापक पी.एन.पाटील यांनी वाचनालयास पुस्तके भेट दिली.
युवराज पाटील म्हणाले,एकत्र कुटुंब पध्दती ही आपल्या देशाची ओळख होती. मात्र सध्या एकत्र कुटुंब पध्दती उध्वस्त झाली आहे. त्यामुळे नात्यातील प्रेम,जिव्हाळा आणि हक्काचा मार्गदर्शक हरविला आहे. पूर्वी भावकीतील एखादा कर्ता पुरुष दिसला तर पोरं धूम ठोकायची. मात्र आज मुले आई- वडिलांचे तरी ऐकतात का?सध्या भांडवलदार व माध्यमांनी आपला मेंदू हातात घेतला असून आपण काय खावे,काय प्यावे,हे ते जाहिरातींच्या माध्यमातून शिकवीत आहेत. आज आपले आई-वडील नव्हे तर चित्रपटा तील नायक-नायिका युवा पिढीचे आदर्श आहेत,हे दुदैवी आहे.
यशस्वी उद्योजक अनिल जाहीर यांनी आपण प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात केली,हे सांगत ‘आपण खडतर परिश्रम करा,नम्रता बाळगा,आपणास नक्की यश मिळेल,’असा संदेश युवक-युवतींना दिला.
कु.दिग्विजय माने म्हणाला,आपणास अफजलखानाचा वध,शाहिस्तेखानाची बोटे तोडली एवढाच छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास सांगितला जातो. मात्र राजांनी शेतकऱ्यांची जेवढी काळजी घेतली,ज्या सुविधा दिल्या तेवढ्या आजपर्यंत कोणी दिल्या नाहीत,हेही सांगायला हवे.
प्रारंभी कु.प्रतिक पाटील यांनी स्वागत, प्रा.डॉ.सूरज चौगुले यांनी प्रास्ताविक केले. कु.अथर्व जाधव यांनी आभार मानले. कु.राजकन्या कोळी हिने सूत्रसंचालन केले.
यावेळी तानाजी पाटील,प्रताप सव्वाखंडे, कार्यवाह किरण पाटील,अशोक भोसले, पोलीस पाटील आनंदराव दवणे,माजी उप सरपंच तजमुल चौगुले,खजिनदार विजय पाटील,प्रा.अमोल पाटील,सचिन कांबळे, ग्रंथपाल नारायण पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.