श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.
गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात.
त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात, गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते.
श्री गणपतीची षोड्शोपचार पूजा
आपली सर्व संकटे व विघ्ने दूर व्हावीत. त्याचप्रमाणे आरंभिलेले शुभकार्य निर्विघ्नपणे तडीस जावे म्हणून श्री गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा हजारो वर्षे चालू आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) गणेशमूर्तीची भक्तीपूर्वक पूजा करायची असते. (स्नानादिक आटोपल्यानंतर शुचिर्भूतपणे आसनावर बसून द्विराचमन, प्राणयामादि करून देवपूजेचा भक्तीपूर्वक संकल्प करावा.)
श्री. गजानन, श्री लक्ष्मीनारायण (अथवा अमूक उष्ट) देवताप्रित्यर्थ यथाज्ञानेन यथामिलितोपचारद्रव्यैः षोड्शोपचार पूजनमहं करिष्ये असे म्हणून पाणी सोडावे. देवपूजेस आरंभ करण्यापूर्वी कलशपूजा, शंखपूजा, घंटापूजा व दीपपूजा करावी. कलशदेवताभ्यां नमः सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि असे म्हणून कलशावर गंधपुष्पादि वहावे. अशीच शंख, घंटा आणि दीपपूजा करावी. यानंतर शंखातून पाणी घेऊन अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतो पि वा। यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं सबाह्यभ्यंतरं शुचि या मंत्राने सर्व पूजाद्रव्यांवर व आपल्या मस्तकावर ते प्रोक्षण करावे. नंतर इष्टदेवतेचा ध्यानश्लोक म्हणून आपल्या हृदयकमलात त्या मूर्तीचे ध्यान करावे. त्या भावनामय दिव्य मूर्तीस पूजेच्या प्रतिमेत स्थापण्याकरिता प्राणान् आवाहनामि असे म्हणावे व मी पूजा करेपर्यंत येथे (या मूर्तीत) स्थिर रहा अशी त्या देवाची मनोमन प्रार्थना करावी व अक्षता वहाव्यात. मग ती प्रतिमा, शिला काष्ठ, मृत्तिका अथवा चित्रमय कसलीही असो, अगदी जिवंत, चिन्मय, प्रत्यक्ष आहे अशी भावना करून अत्यंत आदराने पुढील सोळा उपचार मानस व प्रत्यक्ष समर्पण करावे.
1) आवाहनं समर्पयामि : बोलावणे, पूजा ग्रहण
करण्याकरिता ध्यानश्लोकाने हाक मारून ये, ये, अशी
प्रार्थना करणे व देवता येऊन मूर्तीत बसली असे मानणे.
2) आसनं समर्पयामि : बसण्याची बैठक (सुंदर सिंहासन कल्पून अक्षता वाहणे)
3) पाद्यं समर्पयामि : पाय धुण्यास पाणी देणे (तशी कल्पना करून पळीने पाणी सोडावे.)
4) अर्ध्यं समर्पयामि : हात धुण्यास पाणी देणे.
5) आचमनं समर्पयामि : चूळ भरण्यास व घोट घेण्यास पाणी देणे.
6) स्नानं समर्पयामि : अंग धुणे, अभिषेक करणे, पण यावेळी प्रथम पंचामृतस्नान
घालावे. पयो-दधि-घृत-मधु शर्करास्नानंस. गंधोदक, शुद्धोदकस्नानं समर्पयामि।
यानंतर पुरुषसुक्तादिकाने अभिषेक करावा.
7) वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि : नेसण्याचे व पांघरण्याचे वस्त्र
(पीतांबर, शेला इ.) देऊन अलंकाराने समर्पयामि असे म्हणून
अक्षता वहाव्यात.
8) यज्ञोपवीतम समर्पयामि : जानवे (प्रत्यक्ष जानवे किंवा त्या भावनेने अक्षता)
9) गंधं समर्पयामि : चंदन (देवीला हरिद्राकुंकुम सौभाग्यद्रव्य समर्पण करावे.)
10) पुष्पं समर्पयामि : नाना प्रकारची सुवासिक फुले वहावी.
(फुलानंतर तुळशी, बेल, दुर्वा इ. त्या-त्या देवतेची प्रिय पत्रे अर्पावी)
11) धूपं समर्पयामि : सुवासिक उदबत्त्या अथवा धुपाची पूड जाळणे.
12) दीपं समर्पयामि : तुपाच्या तीन वाती पेटवून ओवाळणे.
13) नैवेद्यं समर्पयामि : षडसान्नाचे पंचपक्वानांचे जेवण देणे. (नैवेद्य दाखविल्यानंतर मध्ये पानीयं, उत्तरापोशनं, हस्तप्रक्षा लनं, मुखप्रक्षालनं, करोव्दर्तनार्थ चंदन, तांबुलं, सुवर्णपुष्पदक्षिणा, महाफल, महानीरांजनदीपं, समर्पयामि । म्हणजे आरत्या)
14) प्रदक्षिणा समर्पयामि : देवासमोर देवाच्या उजव्या बाजूस साष्टांग नमस्कार घालावा.
15) नमस्कारं समर्पयामि : शक्य असल्यास देवाच्या सभोवार देवाच्या उजवीकडून, डावीकडे अथवा आपल्या भोवतीच फिरणे.
16) मंत्रपुष्पांजली समर्पयामि : ओंजळीत फुले घेउन अभिमंत्रित करून देवावर उधळणे. यानंतर छत्र-चामरं-गीतं-नृत्य- वाद्यं-आंदोलनं-नटनाट्यावेदं-पुराणपठणं-रथजाश्वपदातीन
सम सर्वराजोपचारार्थ तुलसीपत्र अथवा
अक्षतानं समर्पयामि असे म्हणून देवावर तुळशीपत्र किंवा अक्षता घालाव्यात आणि यथामति
कृतपूजनेन भगवान (अमूक देवता) प्रीयताम्, प्रीतो भवतु, तत्सम् श्रीकृष्णापर्णमस्तु असे म्हणून पाणी सोडावे. आवाहनं नं जानमि न जानमि विसर्जनम् । पूजा चैव व जानामि क्षम्यतां परमेश्वर । असे म्हणून नम्रभावाने वंदन करून (मूर्तीच्या व आपल्या हृदयात स्पर्श करून) मुर्तीतल्या देवास आपल्या हृदयात परत आणून स्थापन करावे व आचमन करावे.
श्री गणेशपूजेचे शास्त्र
गणपती हा विघ्नहर्ता आहे, कोणत्याही संकटातून तो आपल्याला बाहेर काढू शकेल, अशी लोकांची श्रद्धा असते. त्यामुळे या उत्सवाला एक वेगळीच बहार येते. सर्व दैवतांमध्ये गणपतीचे पूजन अग्रक्रमाने करावे असे शास्त्र सांगते. त्यामुळे या आद्यदैवताच्या पूजेसाठी प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने तयार होत असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी गणपतीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना मोठ्या भक्तीभावाने केली जाते. गणपती हे संरक्षणाचे आणि मांगल्याचे प्रतीक असून पार्वतीने संरक्षणासाठीच त्याची स्थापना केली असल्याचे पुराणात सांगितले आहे. आपल्या घरातील गणपतीचे पूजन कसे करावे, षोडशोपचार पूजनाचे महत्त्व काय? ते कशा प्रकारे करावे? गणपतीची मूर्ती कशी असावी याबाबत अनेक भक्तांच्या मनात संभ्रम असतात. त्याबाबत आपण जाणून घेऊ.
दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणेशाची मूर्ती आणून त्याची स्थापना आणि पूजन केले जाते. हा पूजाविधी करण्यामागे एक पौरणिक कथा आहे. पार्वतीने गणपतीची स्थापना संरक्षणाच्या उद्देशाने केली होती. पार्वतीमाता स्नान करत असताना या गणपतीने संरक्षण करावे, कोणालाही आत येऊ देऊ नये अशी पार्वतीची आज्ञा असल्यामुळे भगवान शंकर आल्यावरही गणपतीने त्यांना प्रतिबंध केला. त्यामुळे शंकरांनी त्याचे मस्तक उडविले. पार्वतीने हे पाहिल्यानंतर तिचा शोक अनावर झाला आणि तिने शंकरांना सांगितले की, हा माझा स्थापित केलेला पुत्र होता. तेंव्हा तुम्ही त्याला पुन्हा जिवंत करा. त्यावेळी शंकरांनी आपल्या गणांना आज्ञा देऊन प्रथम दिसेल त्याचे शीर्ष आणावयास सांगितले. गणांनी हत्तीचे शीर्ष आणले आणि ते शंकरांनी गणपतीच्या मृत शरीरावर बसवले. त्यानंतर गणपती हा ‘गजानन’ या अर्थाने प्रसिद्ध झाला.पृथ्वीपासून म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे आपण पूजन करतो, म्हणून त्याला पार्थिव मूर्ती असे म्हणतात. येणार्या सर्व संकटांचे हरण करावे, अशा संकल्पाने आपण गणेशाच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा करत असतो. तसेच मांगल्याचे प्रतीक म्हणूनही गणपतीचे पूजन केले जाते. हे पूजन किती दिवस करावे याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. ज्यांच्याकडे परंपरेने जितके दिवस हा उत्सव असेल तितके दिवस रोज त्याची पूजा करावी. काहींच्या घरी दीड दिवसांचा, काहींच्या घरी पाच दिवसांचा, काहींच्या घरी गौरींबरोबरचा, तर काहींच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो. जेवढे दिवस गणपती घरात असेल तेवढे दिवस दररोज नित्यनियमाने सकाळ-संध्याकाळ त्याची पूजा अर्चा, आरती अवश्य करावी. नैवेद्य दाखवून प्रसाद घ्यावा.
मूर्ती कशी असावी?
घरी स्थापन करण्यासाठी मूर्ती आणली जाते, तेंव्हा ती वीतभर म्हणजे 6 ते 8 इंच उंचीची असावी. ती आसनस्थ म्हणजे दोन्ही पायांची मांडी घातलेली असावी किंवा एक पाय खाली सोडलेला असावा. मूर्तीची मुद्रा सुबक आणि प्रसन्न वाटेल अशी असावी. विशेषतः गणपतीचे डोळे शांत आणि प्रसन्न अशा प्रकारचे असावेत. कारण, डोळ्यांमध्येच सगळे भाव असल्यामुळे ते जर सुबक असतील तर संपूर्ण मूर्ती ही सुबक आणि संपन्न वाटते. गणपतीला गळ्यात हार घालता येईल अशा प्रकारची मूर्ती असावी; अन्यथा काही ठिकाणी हात कानाला चिकटलेले असतात. अशावेळी हार घालता येत नाही. मूषक हे गणपतीचे वाहन असल्यामुळे त्याचे पायाशी चित्र असावे. तसेच हातात फूल, मोदक, एक हात आशिर्वादासाठी आणि एका हातात शस्त्र असावे. ही मूर्ती मातीची अथवा शाडूची असावी.
गणेशाची मूर्ती बनवताना एखाद्या मूर्तीकाराने मूर्तीची सोंड उजवीकडे वळवलेली असते. काही जणांच्या मनात याबाबत थोडासा संभ्रम आहे; परंतु गणपतीची सोंड डावीकडे असावी की उजवीकडे असावी यामागे कोणतेही चांगले अथवा वाईट कारण नाही. समर्थ रामदासांनी गणपतीचे वर्णन करताना ‘सरळसोंड वक्रतुंड त्रिनयना’ असे वर्णन केले आहे. त्यामुळे उजवीकडे किंवा डावीकडे सोंड वळलेली असली तरी त्यामुळे काही बिघडत नाही. मूर्तीचे पूजन करून आपला जो संकल्प आहे त्याची सिद्धी व्हावी, याच हेतूने पूजा केली जाते. त्यामुळे डावीकडे सोंड असलेला गणपती मवाळ आणि उजवीकडे सोंड असलेला गणपती कडक असा विचार भाविकांनी मनात आणू नये.
पूजा कशी करावी?
पूजा हा एक उपचार असतो. त्यामध्ये भक्तीभाव हा महत्त्वाचा आहे. आपण जेंव्हा गणपतीची मूर्ती आणतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये देवत्व येण्यासाठी प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून आवाहन केले जाते. स्नान, पंचामृत स्नान, उष्णोदक स्नान, अथर्वशिर्ष म्हणून अभिषेक यावेळी केला जातो. हे सर्व करताना गणेशाची मूर्ती पार्थिव असल्यामुळे फुलांनी पाणी शिंपडून हे उपचार करावेत. गणपतीचे आगमन होते त्या दिवशी त्याची षोड्शोपचार पूजा झाली पाहिजे. नंतर मात्र पंचोपचार पूजा केली तरी चालते. षोड्शोपचारे पूजा म्हणजे, आवाहन, आसन, पाद्यस्नान, अर्घ्यस्नान, स्नान, पंचामृत स्नान, अत्तर लावून उष्णोदक स्नान, अभिषेक, गंध, अक्षता, हळद-कुंकू, वस्त्र, सुगंधी द्रव्ये म्हणजे अष्टगंध, शेंदूर इत्यादी, फुले-हार, विविध प्रकारची पत्री, दुर्वांची जुडी, तुळशीची पाने, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी प्रकारे हे पूजन केले जाते.
दुर्वांचं महत्त्व
गणपतीला दुर्वा फार प्रिय आहेत. त्यामागेही एक कथा आहे. पुराणकाळात अंगारक नावाचा एक राक्षस होता. तो देवांना फार त्रास देत असे. त्याराक्षसाचा गणपतीने संहार केला. या संहारानंतर गणपतीला बराच त्रास होऊ लागला. कोणत्याही गोष्टीने तो शमेना. यावर बरेच उपाय करण्यात आले; पण गणपतीचा त्रास काही कमी होत नव्हता. यावर ऋषीमुनींनी एक उपाय केला. त्यांनी दुर्वा तोडून त्याचा भारा गणपतीच्या मस्तकावर ठेवला. दुर्वा या शीतल असतात. यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह कमी झाला. त्यामुळे गणपतीला दुर्वा या प्रिय आहेत. त्यामुळे त्याच्या पूजेच्या वेळी त्या
गणपतीला अवश्य वहाव्यात. मंदाराच्या झाडामध्ये गणपतीचा वास असतो, असे शास्त्र सांगते. हे झाड गणपतीला फार प्रिय आहे. त्यामुळे मंदाराची फुले वाहून गणपतीची पूजा करावी. याशिवाय जास्वंदीचे फुलही गणपतीला प्रिय आहे. त्यामुळे पूजेमध्ये त्याचाही समावेश असावा.
मूर्तीचे पूजन करून आरती, मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर घरातील सर्वांनाच एका प्रसन्नतेचा आनंद अनुभवायला मिळतो. षोड्शोपचार पूजनाचे महत्त्व खूप आहे. सर्व उपचार पद्धतीमध्ये ती उत्तम आहे. देवत्व येण्यासाठी यातील सर्व उपचारांचा समावेश करणे अपेक्षित आहे. असे पूजन करताना म्हंटलेल्या मंत्रांनीच मूर्तीमध्ये देवत्व येते आणि नंतर हे देवत्व मंत्रांनीच काढून ती विसर्जित केली जाते. गणपतीच्या पूजेमुळे आपल्यावरील संकटे दूर होतात, अशीही श्रद्धा आहे. कोणतंही संकट नसेल तरी गणपतीची तेवढ्याच सश्रद्ध मनाने पूजा केल्यामुळे येणारी संकटं दूर होतात, असं मानलं जातं. जेवढे दिवस आपल्या घरात गणपतीचा उत्सव असेल तेवढे दिवस भावपूर्ण पद्धतीने त्याचे पूजन करून, शेवटच्या दिवशी संध्याकाळी पूजा करून नैवेद्य दाखवून उत्तर पूजेचे मंत्र म्हणावे. मगच मूर्तीचे विधिवत विसर्जन करावे. गणपती ही मांगल्याची देवता असल्यामुळे या कालावधीत सर्वत्र, घराघरांत अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे
वातावरण दिसून येते. महाराष्ट्रात असंख्य गणेशभक्त आहेत. त्या सर्व गणेशभक्तांना गणपती उत्सवाच्या अनेक शुभेच्छा!
॥ गणपतीची आरती ॥
सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती जयदेव जयदेव ॥ धृ॥
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रूणझुणती नुपुरे चरणी घागरिया
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती जयदेव जयदेव ॥ 2॥
लंबोदर पितांबर फणीवरवंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती जयदेव जयदेव ॥ 3 ॥
॥ आरती श्री देवीची ॥
दुर्गे दुर्घट भारी तुजविणं संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणातें वारी
हारी पडलो आतां संकट निवारी ॥ 1 ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥
त्रिभुवनभुवनी पाहता तुजं ऐसी नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे कांही
साही विवाद करितां पडिले प्रवाही
ते तूं भक्तालांगी पावसी लवलाही
॥ जय देवी ॥ 2॥
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा
क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा
॥ जय देवी ॥ 3॥
॥ श्री शंकराची आरती ॥
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकी बाळा
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥1॥
जय देव जय देव जय श्री शंकरा
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ ॥
कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव ॥ 2 ॥
देवी दैत्यी सागरमंथन पै केले
त्यामाजी अवचित हलाहल जे उठिले
ते त्वां असुरपणे प्राशन केले
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय देव ॥ 3 ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुळटिळक रामदासा अंतरी
॥ जय देव ॥4॥
॥ श्री दत्ताची आरती ॥
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥1॥
जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
अभाग्यासी कैची कळेल ही मात
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ जय ॥ 2 ॥
दत्त येऊनिया उभा ठाकला
सद्भावे साष्टांगे प्राणिपात केला
प्रसन्न होऊनी आशिर्वाद दिधला
जन्म मरणाचा फेरा चुकविला ॥ जय ॥3॥
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मीतूंपणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्री दत्तध्यान ॥ जयदेव ॥4॥
॥ श्री विठोबाची आरती ॥
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म
आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥1॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा
रखुमाईवल्लभा राहींच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ धृ ॥
तुळशीमाळा गळा कर
ठेवूनी कटी
कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥ जयदेव ॥2॥
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा जयदेव ॥3॥
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती
दिंड्या पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा वर्णावा
किती जयदेव ॥4॥
आषाढी कार्तिकी
भक्तजन येती
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती
केशवासी नामदेव
भावे ओवाळिती
जयदेव ॥5॥
।।श्रीरामचंद्रांची आरती।।
॥ श्री हनुमानाची आरती ॥
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ॥
कडाडिले ब्रम्हांड धाक त्रिभुवनी
सुरवर नर निशाचर
त्या झाल्या पळणी ॥1॥
जय देव जय देव श्रीहनुमंता ।
तुमचेनी प्रसादे ना भी कृतांता ॥धृ ॥
दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ।
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद
रामी रामदासा शक्तीचा शोध ॥ जय ॥2॥
॥ प्रार्थना ॥
घालीन लोटांगण, वंदीन चरण
डोळ्यांनी पाहिन रुप तुझे
प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन
भावे ओवाळिन
म्हणे नामा ॥1॥
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्व मम देवदेव ॥ 2 ॥
कायेन वाचा मनसेंद्रियैंर्वा,
बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावत्
करोमि यज्ञ्ं सकलं परस्मै,
नारायणायेति
समर्पयामि ॥ 3 ॥
अच्युतं केशवं रामनारायणं,
कृष्णदामोदरं वासुदेवं हरि
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,
जानकीनायकं
रामचंद्रं भजे ॥4॥
हरे राम हरे राम,
राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण,
कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
॥ श्री जोतिबाची आरती ॥
भागिरथी मूळशीतल हिमाचलवासी ।
न लगत पल खल-दुर्जन संहारी त्यासी ।
तो हा हिम-केदार करवीरापाशी ।
रत्नागिरीवर शोभे कैवल्यराशी ॥1॥
जयदेव जयदेव जय जय केदारा ।
दासा संकटी तारा भवभय निवारा ॥धृ॥
उत्तरेचा देव दक्षिणी आला ।
दक्षिण-केदार नामे पावला ।
रत्नासुर मर्दोन भक्ता पावला ।
दास म्हणे थोर भाग्ये लाभला ॥2॥
जयदेव जयदेव जय जय केदारा ।
दासा संकटी तारा भवभय निवारा ॥
जोतिबाच्या नावानं चांगभलं ।
॥ आरती गौरीची ॥
मंगळागौरी नाम तुझे । तुला नमन असो माझे॥
भवदुःखाचे हे ओझे । देवी उतारवे सहजे॥1॥
जय माये मंगळागौरी । तुजला पुजूं अंतरी ॥
नाना विधिउपचारी । दीप ओवाळूं सुंदर ॥ धृ ॥
गजाननाची तूं माता । शंकराची प्रिय कांता॥
हिमाचलाची तू दुहिता । मज तारिं तारिं आतां ॥ जय.॥ 2 ॥
लागे तुझ्या चरणाशी ॥ जाळी पापांचिया राशी ॥ जय.॥ 3 ॥
भक्ति ठसावी मानसी । अंबे न्यावे पायांपाशी ॥ 4 ॥
गौरी ओवाळित्ये दीप । नेणें तुझे नामरूप ॥
वाढवावे सौभाग्य अमूप । विश्वाची तूं मायबाप
॥ जय ॥ 5 ॥
॥ मंत्रपुष्पांजली ॥
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि
प्रथमान्यासन्
तेहनाकं महीमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः
सन्ति देवाः
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे
स मे कामान् कामकामाय मह्यं
कामेश्वरो वैश्रवणौ ददातु
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः
ॐ स्वस्ति साम्राज्यं, भौज्यं, स्वाराज्यं
वैराज्यं, परामेष्ठयं, राज्यं,
महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईस्यात्
सार्वभौमः
सार्वायुष आंतादापरार्धात्
पृथ्वीव्यै समुद्रपर्यंताया एकराळितिः
तद्प्येषः श्लोको भिगीतो मरुतः परिवेष्टारो
मरुत्तस्यावसन् गृहे
अविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः
सभासद इति ॥
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
॥ मंगलमूर्ती मोरया ॥
संकटनाशन श्री गणपती स्तोत्र
॥ श्री गणेशाय नमः ॥ नारद उवाच ॥
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ॥
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥1॥
प्रथमं वक्रतुंड च एकदंतं द्वितीयकम् ॥
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥2॥
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ॥
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥3॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् ॥
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥4॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ॥
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥5॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ॥
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥6॥
जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ॥
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ 7 ॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ॥
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥8॥
॥ इति श्रीनारदपुराणे संकटनाशन गणेशस्तोत्रं संपूर्णम् ॥
॥ श्री गणेश विसर्जनाचा विधी ॥
दुपारनंतर पुन्हा स्नान करून, सोवळे नेसून, पाटावर आचमन करावे व पुढील संकल्प करावा.
अद्येत्यदिपूर्वेाच्चारितएवंगुणविशेषेणविशिष्टायां शुभपुण्यातिथौ ममआत्मनः
श्रृतिस्मृतिपुराणोत्क फलोप्रात्यर्थ श्रीपार्थिवमगणपतिदेवताप्रीत्यार्थ पंचोपचारैः
उत्तरेपूजनंकरिष्ये। असे म्हणून उदक सोडावे. नंतर गंध पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे उपचार
पूर्वी पूजाप्रयोगात सांगितलेल्या मंत्रांनी अर्पण करावेत. उदाहरणार्थ-
श्री पार्थिवमहागणपतये नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
श्री पार्थिवमहागणपतये नमः । पुजार्थेपुष्पाणि समर्पयामि ।
श्री पार्थिवमहागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।
श्री पार्थिवमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि ।
श्री पार्थिवमहागणपतये नमः नैवेद्यार्थ खाद्यनैवेद्यं समर्पयामि ।
नंतर विडा, दक्षिणा, फल ठेवावे. आरती, मंत्रपुष्प, दुर्वासमर्पण इ.
झाल्यावर प्रार्थना करावी. शेवटी अनेन यथाज्ञानेन यथामीलितोचारैः कृत उत्तर
पूजनेन भगवान श्री पार्थिव महागणपतीः प्रीतयाम । असे म्हणून उदक सोडावे.
कुटूंबातील सर्वांनी गणपतीला गंध-फूल दुर्वा वहाव्यात. नमस्कार करावा. देवाची
विशेष प्रार्थना हात जोडून करावी
कृपादृष्टी ठेवा हीच प्रार्थना ! मंगलमूर्ती मोरया !!
नंतर पुढील मंत्रांनी देवावर विसर्जनाच्या अक्षता वहाव्यात.
तो मंत्र असा-
देवा गणराया आपली पूजा कशी करावी,
यान्तु देवगणाः सर्वेपूजामादाय पार्थिवीम् ।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च ॥
अक्षता घातल्यावर मुर्ती जरा सरकवावी. नंतर इष्टमित्र, कुटुंंबिय मंडळींसह
ती मूर्ती जलाशय, नदी, समुद्र इत्यादी पवित्रस्थळी पोहोचवावी. जाताना देवाबरोबर
दही, भात, पोहे इ. शिदोरी म्हणून देण्याचा प्रघात आहे. घरी परत आल्यावर
सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती म्हणावी. पूजा आपण स्वतःच केली असेल तर
देवापुढील विडा, दक्षिणा दान द्यावी. किंवा सत्कार्यार्थ अर्पण करावी.
अष्टविनायक माहिती
अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती मंदिरे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या या मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे. श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील आठ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तीना विशेष महत्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून अष्टविनायक म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो सुखकर्ता
दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या.परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा. करतात अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच
(मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओजर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी अष्टविनायक स्थाने आहेत. या गणपतींपैकी महडचा व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे.
या सर्व गणपतींची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
मोरगाव : अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणरी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते. जवळच कर्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे.
थेऊर : अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे.
सिद्धटेक : सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.
रांजणगाव : अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की ः- त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करुन त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुरारिवदे (?) महागणपती असेही म्हटले जाते. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे.
ओझर : अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूस तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे.
लेण्याद्री : अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून मूर्ती ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडाकमध्ये कोरीवकाम खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केेलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पाय-या आहेत.
महड : महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर
नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तिच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय.
पाली : पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळश्वेर म्हणतात.
बल्लाश्वेर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून,सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वर सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वर मंदिर वसले आहे. अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायाकाच्या दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतील प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायाकाची यात्रा करणार्या अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक यात्रा करणार्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.