What A Match…!!! ५० वर्षांनंतर भारताची ‘विराट’ कामगिरी
रोहित शर्माची तुफानी खेळी,लॉर्ड शार्दुलची अष्टपैलू कामगिरी,मालिकेत 2-1 ने आघाडी
लंडन : केनिंग्टन ओव्हल मैदानावर चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने विजयी तिरंगा फडकावला आहे. अत्यंत रोमांचक ठरलेल्या या कसोटीत विराटसेनेने इंग्लंडला १५७ धावांनी पराभूत करून तब्बल ५० वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.
सामन्यात पाचव्या दिवसाअखेर इंग्लंड संघाला २९१ धावांची गरज होती. इंग्लंड संघाकडे संपूर्ण संघ फलंदाजीसाठी शिल्लक होता. परंतु भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करीत इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूत पाठवले.
लंचनंतर खेळपट्टीने आपला रंग बदलला आणि जडेजासह बुमराहने आपले कौशल्य दाखवायला सुरुवात केली. १९७१ मध्ये भारताने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात या मैदानावर शेवटचा कसोटी विजय मिळवला होता.आता हा विजय संपादन करून तब्बल ५० वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.या विजयासह मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपवला.त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती.ही आघाडी फोडत भारताने दुसऱ्या डावात 466 धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला 368 धावांचे आव्हान दिले. भारताने दिलेले हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवले नाही. इंग्लंडचा संघ 210 धावांमध्ये गारद झाला.त्यामुळे भारताने या सामन्यात इंग्लंडवर 157 धावांनी मात करत मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिकेत आता भारताने आघाडी घेतली आहेत. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत होता. त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात 151 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. तर तिसऱ्या कसोटी भारताने 76 धावांनी गमावली. ज्यामुळे मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आली आहे. आता चौथी कसोटी जिंकत भारताने पुन्हा एकदा 2-1 आघाडी मिळवली आहे.