सांगली । शिक्षण संस्थांचा प्रशासकीय आणि सर्व सेवक वर्गांच्या निष्ठा आणि कर्तव्य भावनेतून संस्था सर्व स्तरावर वृद्धिंगत होत जाते. अशाच कर्तव्य भावनेतून खा. स्व. एस.डी. पाटील यांनी या संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजाचे हित जोपासले,असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन.शिंदे यांनी केले.
वाळवा तालुका शिक्षण संस्था आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्यावतीने इस्लामपुरात खा.एस.डी. पाटील यांचा स्मृतिदिन व ऍड.बी. एस. पाटील लिखित आनंदयात्री चरित्र ग्रंथ प्रदान समारंभात कुलसचिव डॉ. शिंदे बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव ऍड. बी. एस. पाटील होते.प्रारंभी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव यांनी आपल्या स्वागत प्रास्ताविकात संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक प्रगतीचा धावता आढावा घेतला.याप्रसंगी प्रामुख्याने संस्थेचे सहसचिव आणि शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलचे माजी सदस्य एड. धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष सौ. अरुणादेवी पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, जीवन हा आनंदाने जगण्याचा मार्ग आहे.कला,छंद जोपासावेत.निसर्ग व वृक्षांवर प्रेम करावे.शिक्षण संस्थांमधील सर्व प्रशासन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनीच विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानला पाहिजे. दुसऱ्यांचे दोष अनेक जण पाहतात,पण दुसऱ्यांबद्दल चर्चा करण्यापेक्षा भविष्यातील सकारात्मक आणि नव्या योजनांबद्दल सर्वांनी विचार करायला हवा.असाच भविष्याचा वेध खा. एस.डी. पाटील यांनी आयुष्यभर जोपासला.आपल्या आचार विचारामुळे पुढच्या पिढीची फसगत होऊ नये. नव्या शैक्षणिक राष्ट्रीय धोरणाला अनुसरून प्रत्येकाने बदलांना सक्षम व समर्थपणे सामोरे जाण्याची गरज असून सुसंस्कारांची फळी निर्माण व्हायला हवी.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ऍड. बी. एस. पाटील म्हणाले,संस्था हे कुटुंब मानून सर्व सेवक वर्ग कार्यरत आहे. आपल्या संस्थेला कोणताही मोठा आधार नसताना संस्थेच्या शाखा वाढत आहेत.आपल्या मनोगतात सहसचिव ऍड. धैर्यशील पाटील म्हणाले,खा. एस.डी. पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा समर्थपणे सांभाळून संस्था गुणात्मक दृष्ट्या देखील वृद्धिंगत होत आहे,बहुजनांचे हित जोपासत आहे,असे सांगून ॲड. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ स्तरावर घेतलेल्या व दूरगामी परिणाम करणाऱ्या विधायक निर्णयांचे दाखले यावेळी दिले.
याप्रसंगी प्राथमिक स्वरूपात मान्यवरांना आनंदयात्री चरित्र ग्रंथ प्रदान करण्यात आला.पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी करून दिला.प्राचार्य डॉ.ए. एल. बेलवटकर यांनी मान्यवरांचे आभार मानले.प्रा. स्मिता डुबल,प्रा. ऐश्वर्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले.कुलसचिव डॉ.शिंदे यांना संस्थेच्यावतीने दिलेल्या दिलेल्या सन्मानपत्राचे वाचन प्रा. अमोल चांदेकर यांनी केले.या समारंभास आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राचार्य स्मिता माने यांच्यासह संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक,प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर सेवक वर्ग उपस्थित होता.