मुंबई । मतदानासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या उद्योग समूह, महामंडळं, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ ला मतदान होणार आहे. मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावं, यासाठी भरपगारी सुटी किंवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुटी देणं शक्य नसेल अशा आस्थापनांनी दोन तासांची सवलत मतदारांना द्यावी, मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणं आवश्यक राहील. मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे.