काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे शहरात दाखल, नागरिकांशी साधला संवाद
ठाणे । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज दूपारी मुंबईत दाखल झाली. आज सकाळी ठाण्यामधील यात्रेत गांधी यांनी आनंद दिघे यांच्या पुतळयाचं दर्शन घेतलं आणि चिंतामणी चौक इथं सभा घेतली.शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपानं निवडणूक रोख्यांचा पैसा वापरला, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सिरम कंपनीनंही भाजपाला कोटयवधींचा निधी दिल्याचं गांधी म्हणाले. देशात ओबीसी, दलित, मागास, आदिवासी समाजाची लोकसंख्या ८८ टक्के आहे. पण प्रशासनासह महत्वाच्या क्षेत्रात त्यांची भागीदारी अत्यंत कमी आहे, असं गांधी यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर मुलुंड इथून गांधी यांच्या यात्रेच्या मुंबई प्रवासाला सुरुवात झाली, यावेळी प्रियंका गांधी त्यांच्यासोबत होत्या. दरम्यान भाजपाची नीती विभाजनकारी असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.
रमेश यांनी आज महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत वार्ताहर परिषद घेतली.भारत जोडो न्याय यात्रेत काँग्रेसनं युवा न्याय, शेतकरी न्याय, महिला न्याय, कामगार न्याय आणि भागीदारी न्याय अशा पाच न्याय गॅरंटी दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसची गॅरंटी व्यक्तीची नाही तर पक्षाची असल्याचं रमेश यांनी यावेळी सांगितलं.यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे उपस्थित होते.