Last Updated on 14 Dec 2025 8:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधान परिषदेत माहिती
नागपूर । राज्यातील ज्या गावात स्मशानभूमीसाठी जागा नाही अशा गावात स्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध करणे आणि स्मशान भूमी बांधणे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक गावात स्मशान भूमी असली पाहिजे. ज्या गावात स्मशानभूमीसाठी जागा नाही अशा गावात जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात येतील.
ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीमधून जन सुविधा कार्यक्रमातून तसेच राज्य शासनामार्फत २५:१५ मधून गावात विकासकामे केली जातात. ही विकास कामे मंजूर करताना त्या गावात स्मशानभूमी असल्याचा दाखला जोडल्यानंतरच ती मंजूर केली जातील. जर त्या गावात स्मशानभूमी नसेल तर स्मशानभूमीच्या कामास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असेही ग्रामविकास मंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले.










































































