Last Updated on 02 Jul 2026 3:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कराड ।
ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या पाणंद रस्त्यांच्या रखडलेल्या कामांचा प्रश्न, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज विधानसभेत उपस्थित करत राज्य सरकारचे लक्ष वेधले. कराड दक्षिणमधील पाणंद रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी सभागृहात केली.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघात २ वर्षांपूर्वी ‘मातोश्री पाणंद रस्ता दुरुस्ती योजना’ अंतर्गत तब्बल २२७ किलोमीटर पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यातील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी ते म्हणाले, १० जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार कराड दक्षिण मतदारसंघातील तब्बल २२७ किलोमीटर रस्त्यांना ‘मातोश्री पाणंद रस्ता दुरुस्ती योजना’ अंतर्गत मंजुरी देण्यात आली. मात्र जवळपास २ वर्षांचा कालावधी उलटूनही या मंजूर कामांपैकी केवळ ५१ रस्त्यांचीच कामे पूर्ण झाली असून, उर्वरित अनेक रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. अपूर्ण राहिलेले हे रस्ते मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता दुरुस्ती योजनेमध्ये वर्ग करून उर्वरित कामे पूर्ण करता येतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांनी, सध्या ही योजना महसूल विभागाशी संबंधित असून, काही कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. त्यामुळे या विषयावर लवकरच महसूल विभाग आणि रोजगार हमी विभागाची संयुक्त बैठक घेऊन, अपूर्ण कामे मुख्यमंत्री बळीराजा योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणंद रस्त्यांचा प्रश्न आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मांडल्याने आता शासनस्तरावर त्याबद्दल हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे कराड दक्षिणेतील रखडलेल्या पाणंद रस्ते कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













































































