Last Updated on 17 Feb 2026 6:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाकांक्षी असा ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी रू.111 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीची बसस्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी यांसारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण 633 ठिकाणी तब्बल 7035 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यामुळे एसटीच्या प्रत्येक हालचालीवर सतत डिजिटल नजर राहणार आहे.
या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (TCIL) या अनुभवी संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू असून, या प्रकल्पाचा एकूण कालावधी 1 वर्ष निश्चित करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले असून, त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी (UAT) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येणार आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील 64 महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे, ज्यामुळे सुरक्षेची नवी दिशा निश्चित झाली आहे. उर्वरित 27 विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची पुढील कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे.
या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांवर आणि कार्यालयांमध्ये सुरक्षिततेचे नवे पर्व सुरू होणार आहे. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार असून, कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हा केवळ कॅमेरे बसविण्याचा उपक्रम नसून, तो एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच देणारा आणि प्रवाशांच्या विश्वासाला नवे बळ देणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. यामुळे ‘लालपरी’चा प्रवास आता केवळ वेगवानच नव्हे, तर अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानसज्ज होणार असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले आहे.












































































