मुंबई | राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, येत्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामुळे राज्यातील शालेय शिक्षणपद्धतीत मोठा बदल अपेक्षित आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) अंमलात आणण्यासाठी अखेर अधिकृत अध्यादेश जारी केला आहे.
या नव्या अभ्यासक्रमाची रचना 5+3+3+4 या संकल्पनेवर आधारित असून, यात बाल्यावस्था शिक्षणापासून ते उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंतचा समावेश आहे. पूर्वीची 10+2+3 रचना आता नव्या पद्धतीने बदलण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या वयाचा, समजुतीचा आणि शैक्षणिक गरजांचा विचार करण्यात आलेला आहे.
नवीन धोरणानुसार पारंपरिक १०+२ ची रचना संपुष्टात येणार असून, त्याऐवजी 5+3+3+4 या चौकटीत शालेय शिक्षण विभागलं जाईल.
टप्पा | वयोगट | इयत्ता | वैशिष्ट्ये |
---|---|---|---|
पायाभूत (Foundational) | 3-8 वर्षे | बालवाडी ते 2 री | खेळ आणि अनुभवात्मक शिक्षण |
पूर्वतयारी (Preparatory) | 8-11 वर्षे | 3 री ते 5 वी | भाषा, क्रियाकलाप व मूलभूत संकल्पना |
मध्य (Middle) | 11-14 वर्षे | 6 वी ते 8 वी | विज्ञान, गणित, सामाजिक विषयांचे आकलन |
माध्यमिक (Secondary) | 14-18 वर्षे | 9 वी ते 12 वी | बहुविषयक, कौशल्य आणि मूल्याधारित शिक्षण |
अंमलबजावणीचा कालावधी:
-
२०२५-२६ : इयत्ता १ लीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू
-
२०२६-२७ : इयत्ता २ री, ३ री, ४ थी, व ६ वी
-
२०२७-२८ : इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी व ११ वी
-
२०२८-२९ : इयत्ता ८ वी, १० वी व १२ वी
शिक्षक, पालक आणि शाळांसमोरची आव्हानं
-
नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांना नव्याने प्रशिक्षण आवश्यक
-
पालकांना नवीन मूल्यांकन आणि अभ्यासपद्धती समजून घेणं गरजेचं
-
सर्व शाळांमध्ये समान डिजिटल आणि शैक्षणिक संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करणं ही मोठी जबाबदारी
भाषाशिक्षण धोरणात बदल : मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश करण्यात येणार आहे.
पाठ्यपुस्तकांमध्ये बदल : NCERT कडून तयार करण्यात आलेल्या पुस्तकांवर आधारित, राज्यासाठी आवश्यक त्या अनुकूल बदलांसह नवीन पुस्तकांची अंमलबजावणी केली जाणार आहे. ‘बालभारती’ आणि राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून ही पुस्तके तयार केली जातील.
वाढती आशा आणि आव्हाने : नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, अनुभवात्मक पद्धती, मूल्याधारित शिक्षण आणि मूल्यमापनातील बदल संभवतात. मात्र, शाळा, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी या बदलांचा स्वीकार आणि अंमलबजावणीसाठी योग्य तयारी गरजेची ठरणार आहे.
उपशिक्षण सचिव तुषार महाजन यांच्या सहीने हा आदेश १६ एप्रिल २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. हा अध्यादेश शिक्षण क्षेत्रातील क्रांतीची सुरुवात मानली जात आहे. ही शिक्षणक्रांती विद्यार्थ्यांना केवळ गुणांसाठी नव्हे, तर जीवन-कौशल्यांनी युक्त अशा व्यक्तिमत्त्व घडवण्याच्या दिशेने उचललेलं महत्त्वाचं पाऊल ठरेल.
हे धोरण केवळ शिक्षण पद्धतीतच नव्हे, तर संपूर्ण पिढीच्या घडणीत आमूलाग्र बदल घडवणारे ठरणार आहे.