उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय
मुंबई । राज्यातील कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.जे काही कंत्राटी भरतीचे जीआर निघाले ते काँग्रेस,राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारनेच काढले असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले,कंत्राटी भरतीचे पाप 100 टक्के काँग्रेस,शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे आहे.कंत्राटी भरती करण्यासंदर्भात अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारने वेगवेगळे निर्णय घेतले आहेत.त्यामुळे त्या सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली.आधीच्या सरकारचे पाप आपण का उचलायचे.त्या सरकारने केलेले कंत्राटी भरतीचे जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला.पाप त्यांनी करायचे आणि आमच्या माथ्यावर फोडायचे,वरून आंदोलन करायचे हे आम्हाला मान्य नाही असे म्हणत थेट उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांनी प्रश्न विचारला.आम्ही जीआर रद्द केल्यानंतर काँग्रेस,उबाठा,शरद पवार यांची राष्ट्रावादी काँग्रेस माफी मागणार का? युवकांची फसवणूक केल्याबद्दल माफी मागणार नसेल तर आम्हाला सगळी कागदपत्रे जनतेपर्यंत नेऊ अशा शब्दात विरोधकांना फडणवीसांनी इशारा दिला.
कंत्राटी भरतीला मान्यता कुणी दिली.उद्धव ठाकरे सरकारने त्यांच्या सहीने,शरद पवारांच्या आशिर्वादाने ही मान्यता देण्यात आली,असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.हा शासन निर्णय बघा.17 जुलै 2020 रोजी बाह्ययंत्रणेमार्फत गट ड संवर्गातील भरतीसाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया करणेबाबत,असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतलेला शासन निर्णय दाखवला.