Last Updated on 24 Oct 2024 8:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ग्रामपंचायत स्तरावर दर तासाला हवामानाची ताजी माहिती
ग्रामपंचायतींना पाच दिवसांचा दैनंदिन हवामानाचा अंदाज मिळणार
नवी दिल्ली । केंद्र सरकार आजपासून ग्रामपंचायत स्तरावर दर तासाला हवामानाची ताजी माहिती देणार आहे. पंचायती राज मंत्रालय आज ग्रामपंचायतींसाठी हवामान अंदाज सेवा सुरू करणार आहे. याअंतर्गत ग्रामपंचायतींना पाच दिवसांचा दैनंदिन हवामानाचा अंदाज मिळणार आहे.
हवामानाची आगाऊ माहिती घेऊन शेतकरी आपल्या पिकांचं संरक्षण करू शकतील. शेती आणि आपत्ती व्यवस्थापनात हवामानाच्या अंदाजाला खूप महत्त्व असून वेळेवर हवामानाचा अंदाज मिळाल्याने शेतकरी त्यांच्या पिकांचे उत्तम व्यवस्थापन करू शकतील. पंचायती राजमंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ही सेवा सुरू होणार आहे.
सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्याचा एक भाग म्हणून, हा उपक्रम तळागाळातील प्रशासनाला बळकट करतो आणि शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देतो, ज्यामुळे ग्रामीण लोकसंख्या अधिक हवामान-लवचिक आणि पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक सुसज्ज बनते,असे निवेदनात म्हटले आहे. IMD च्या विस्तारित सेन्सर कव्हरेजद्वारे समर्थित, ग्रामपंचायत स्तरावर स्थानिकीकृत हवामान अंदाज उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे .













































































