Last Updated on 13 Jan 2025 8:45 AM by Sanjay Patil/Adhorekhit
शिर्डी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना एकही जागा मिळणार नाही असं नियोजन करण्याचं आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं.
प्रदेश भाजपाच्या शिर्डी इथं झालेल्या अधिवेशनात ते बोलत होते. महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे, असं सांगत शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर टीका केली. राज्याला अस्थिरतेतून बाहेर काढून एक मजबूत स्थिर सरकार देण्याचं काम जनतेनं केलं असंही अमित शाह म्हणाले.
येत्या तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळाला असला तरी गाफील राहून चालणार नाही. कंबर कसून पुन्हा एकदा मैदानात उतरायचं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सरकारचे कार्यक्रम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचे आहेत, असं ते म्हणाले. येत्या तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून या निवडणुकीतही विधानसभेसारखाच विजय मिळवायचा आहे असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं शिवशाही स्थापन करण्यासाठी अभूतपूर्व यश दिलं आहे. भाजपाच्या आतापर्यंतच्या इतिहासाचं हे सुवर्णशिखर आहे, असं भाजपाचे ज्येष्ठे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. केवळ सरकार बदलणं नाही तर समाज बदलणं हे भाजपाचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचं सुराज्यात रुपांतर करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं गडकरी यांनी सांगितलं.भविष्यातला महाराष्ट्र बनवायचा संकल्प आज आपण करू, असं आवाहन त्यांनी केलं.
विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेने विजयी कौल दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी हे अधिवेशन आहे, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
अधिवेशनाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. तसंच राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं.













































































