Last Updated on 20 May 2025 1:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित होते.
गेल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेत आल्यावर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ते नाराज होते आणि त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार यांनी मंत्रिमंडळात डावलल्याने भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस यांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. अखेर त्यांच्या संयमाचे फळ त्यांना मिळाले आहे, असे म्हटले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना संधी देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते भुजबळ यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही भुजबळ यांनी हे खाते सांभाळले आहे.
सात दिवसांपूर्वी झाला निर्णय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सात दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यासंदर्भातील निर्णय भुजबळ यांना कळवला होता. छगन भुजबळ यांनी त्याला दुजोरा देत आपणास एका ओळीचा संदेश मिळाल्याचे सांगितले. दरम्यान, सुनील तटकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीची एक जागा रिक्त होती. त्या जागेवर छगन भुजबळ यांना संधी दिल्याये सांगितले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 20 Apr 2026 7:51 AM by Sanjay Patil/Adhorekhit ईश्वरपूर । बहे येथील श्री भैरवनाथ यात्रेला प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात सुरुवात झाली. अक्षय्य तृतीयेला सायंकाळी पा... Read more














































































