Last Updated on 08 Jul 2023 8:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आनंदी : श्रेष्ठत्व ज्येष्ठत्व या डॉ. ए. एम. गुरव यांच्या पुस्तकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन
कोल्हापूर । शिवाजी विद्यापीठामधील मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आनंदी : श्रेष्ठत्व- ज्येष्ठत्व पुस्तक प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के होते.तसेच या कार्यक्रमाला कणेरीमठाचे मठाधिपती अदृश्य काडसिध्देश्वर महाराज यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.
या पुस्तक प्रकाशन प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठत्व हे सर्वानांच लाभणार आहे व त्यासाठी आपण तयार असले पाहिजे तसेच तो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे असे प्रतिपादन केले. प्रा. डॉ. ए. एम. गुरव हे सिध्दलिखित लेखक आहेत व सतत कार्यरत असतात याचा त्यांनी आपल्या संभाषणात आवर्जून उल्लेख केला. प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी आजपर्यंत 40 हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे.
हेही वाचा : तब्बल 28 वर्षांनी एकत्र आलेल्या सवंगड्यांनी घेतला ‘मैत्री बँक’ सुरू करण्याचा निर्णय
आनंदी : श्रेष्ठत्व – ज्येष्ठत्व पुस्तक प्रकाशन प्रसंगी अदृश्य काडसिध्देश्वर महाराजांनी मानवाच्या जीवनातील चार स्थिती सांगितल्या.विद्यार्जन, अर्थार्जन, पुण्यार्जन आणि वानप्रस्थाश्रम यांचे महत्व समजावून सांगितले.

काडसिध्देश्वर महाराज म्हणाले,बदलत्या वातावरणाला जुळवून घ्या,100 वर्षे जगण्याचा निश्चय करा.या काळामध्ये विद्यार्जन,धनप्राप्ती,पुण्य कमाई व संन्यस्थ जागी जीवन जागा मधमाशी जशी फुलाला इजा न होता मध गोळा करते तसे आयुष्यात इतरांना त्रास होणार नाही असे काम करा.कोणाचे शोषण होणार नाही याची काळजी घ्या.आपण संस्कार देण्यास कमी पडू नका,आपल्या मुलांकडून प्रथम क्रमांक मिळवण्याचा अट्टाहास धरू नका.सृष्टीची निर्मिती व समस्याचे निराकरण भगवंत करतो.भगवतांकडूनच उपाय सुचवले जातात.त्याची जाणीव होणे आवश्यक आहे.
पुस्तकाचे लेखक श्रीकांत आडिवरेकर यांनी पुस्तकाची निर्मिती,संकल्पना कशी तयार झाली.याबाबतचे विश्लेषण केले.लेखक प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी पुस्तकात असलेल्या विविध लेखाविषयी तसेच ज्येष्ठांच्या समस्या व उपाय याबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास दुरशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. डी. के. मोरे,आजीवन अध्ययन केंद्राचे डॉ. रामचंद्र पवार,एम. बी. ए. विभागाच्या डॉ. दीपा इंगवले आदी उपस्थित होते.डॉ. के. बी. मारुलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.








































































