Last Updated on 05 Jan 2025 10:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या 40 व्या स्थापना दिनाला संबोधित करताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा, अंतराळ विभागाचे राज्यमंत्री मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संलग्न असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेद्वारे (CSIR) स्वदेशात विकसित “पॅरासिटामॉल” या औषधाची घोषणा केली. “पॅरासिटामॉल” हे औषध सामान्यतः वेदनाशामक तसेच ताप यासारख्या आजारांवर उपचारांसाठी वापरले जाते.
सीएसआयआर ने, वेदना कमी करण्यासाठी आणि ताप कमी करण्यासाठी व्यापक प्रमाणात वापरले जाणारे पॅरासिटामॉल हे औषध तयार करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले. भारताला पॅरासिटामॉल निर्मितीमध्ये स्वावलंबी बनवणे, आयात घटकांवरचे अवलंबित्व कमी करणे हे या नवोन्मेषाचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.
कर्नाटकस्थित सत्य दीपथा फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही औषधनिर्माण कंपनी या तंत्रज्ञानाचा उपयोग परवडणाऱ्या पॅरासिटामॉलचे देशांतर्गत उत्पादन करण्यासाठी करेल. सध्या, भारत विविध देशांकडून पॅरासिटामॉल उत्पादनासाठी लागणारा प्रमुख कच्चा माल आयात करतो. त्यामुळे सीएसआयआर चा हा उपक्रम केवळ या अवलंबित्वावर उपाय सुचवत नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत” (आत्मनिर्भर भारत) दृष्टिकोनाशी देखील सुसंगती साधणारा आहे.
सरकारी संसाधनांच्या पलीकडे जाऊन नावीन्यपूर्ण शोध घेण्याची वेळ आपल्यासाठी आली आहे तसेच आपण ज्ञान भागीदारी आणि संसाधनांच्या वाटणीसह बिगर -सरकारी निधी शोधण्यास सुरुवात केली पाहिजे, असे डॉ. सिंह यांनी सांगितले. अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्था (ANRF) हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल असून या अंतर्गत 60% निधी बिगर -सरकारी क्षेत्रांकडून उभारला जाईल, हे त्यांनी अधोरेखित केले.









































































