Last Updated on 15 Jul 2025 6:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
संतोष खटावकर, अशोक खोत यांनाही पुरस्कार जाहीर
कोल्हापूर येथे १८ जुलै रोजी पुरस्कार वितरण
सांगली । भारतीय शुगर या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास “राष्ट्रीय ऊस विकास पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. तसेच कारखान्याचे चिफ अकौंटंट संतोष खटावकर यांना “बेस्ट चिफ अकौंटंट”, तर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद अशोक खोत (इस्लामपूर) यांना “राष्ट्रीय ऊस उत्पादक पुरस्कार”जाहीर करण्यात आला आहे.
शुक्रवार दि.१८ जुलै २०२५ रोजी कोल्हापूर येथे महासैनिक दरबार हॉलमध्ये भारतीय शुगरची ४९ वी वार्षिक सभा व १२ व्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हे पुरस्कार वितरण केले जाणार आहेत.
भारतीय शुगरचे सीईओ संग्रामसिंह शिंदे व अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री आ.जयंत पाटील यांची भेट घेऊन पुरस्कार निवडीची पत्रे देताना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे त्यांना खास निमंत्रण दिले. याप्रसंगी कार्यकारी संचालक आर.डी. माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, चिफ अकौंटंट संतोष खटावकर, अशोक खोत इस्लामपूर प्रामुख्याने उपस्थित होते.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने माजी मंत्री आ.जयंत पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात ऊस विकास क्षेत्रात जे काम केले आहे, त्या कामाचा भारतीय शुगरने पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. राजारामबापू साखर कारखान्यास यापूर्वी व्हीएसआय, राष्ट्रीय साखर संघाच्या वतीने “राज्यातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्या”सह उत्तम ऊस विकास, उत्तम आर्थिक नियोजन, उत्तम तांत्रिक क्षमता आदी विविध पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
भारतीय शुगर ही संस्था गेल्या ५० वर्षापासून सहकारी क्षेत्रात कार्यरत असून सहकारी साखर कारखाने,अधिकारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करून प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे.












































































