Last Updated on 13 Sep 2024 10:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून ‘श्री विजयपुरम’ ठेवण्याचा घेतला निर्णय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी या ऐतिहासिक निर्णयाची केली घोषणा
नवी दिल्ली । केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून “श्री विजयपुरम” ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. ‘X’ वर एका पोस्टमध्ये, गृहमंत्री म्हणाले, देशाला वसाहतवादी प्रतीकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज आम्ही पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून “श्री विजयपुरम” ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पूर्वीच्या नावाला वसाहतवादी वारसा होता, श्री विजयपुरम हे आपल्या स्वातंत्र्यलढ्यात मिळालेल्या विजयाचे आणि त्यात अंदमान आणि निकोबार बेटांनी बजावलेल्या अद्वितीय भूमिकेचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले की, अंदमान आणि निकोबार बेटांना आपल्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात अतुलनीय स्थान आहे. एकेकाळी चोल साम्राज्याचे नौदल तळ म्हणून भूमिका बजावलेला हा प्रदेश आज आपल्या धोरणात्मक आणि विकास आकांक्षांसाठी महत्त्वाचा आधार बनण्यासाठी सज्ज आहे.
अमित शाह म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच ठिकाणी सर्वप्रथम आपला तिरंगा फडकावला आणि सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला ते हेच ठिकाण आहे.











































































