Last Updated on 05 Jul 2025 8:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत “एक दिवस, माझ्या बळीराजासाठी” उपक्रमांतर्गत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी मधील शेतात जाऊन आज डोक्यावरील येरलं बाजूला ठेवून भर पावसात भिजत शेतात पावर टिलरद्वारे चिखलगुट्टा (मशागत) करुन वाफ्यामध्ये भात रोपांची लागण केली.

शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बांधावर बसून झुणका भाकरी, ठेच्याची चव चाखत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच शेतीच्या बांधावर उतरुन शेतीशी नाळ जोडली. शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडी-अडचणी जाणून घेतल्या. नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन पीक उत्पादन वाढीसाठी यापुढेही उपक्रम राबवण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी दिले.
यावेळी राधानगरी- कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, तहसीलदार अनिता देशमुख तसेच कृषी, महसूल व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.














































































