Last Updated on 29 Jan 2026 7:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
विरोधी मंडळी निवडणुकीपुरतेच तुमच्याकडे येतात आणि जातात. मात्र आपले स्व.काकांच्या पासून अगदी जिव्हाळयाचे नाते आहे. आपण माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, माजी आ. मानसिंगभाऊ नाईक यांच्या माध्यमातून या भागाच्या विकासाला सातत्याने गती दिली आहे. विरोधकांच्या भुलथापांना,अमिषाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना मोठया मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष,माजी जि.प.अध्यक्ष देवराज दादा पाटील यांनी केले.
काळमवाडी,केदारगांव येथे वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती संध्याताई आनंदराव पाटील,वाटेगाव पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार प्रकाशराव गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. याप्रसंगी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने, उमेदवार संध्याताई पाटील, प्रकाशराव पाटील,रेठरेधरणचे सरपंच हर्षवर्धन पाटील, माजी सरपंच सौ.लताताई पाटील, वाटेगावचे माजी सरपंच राहुल चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. काळमवाडी येथे भाजपाच्या माजी उपसरपंच भाग्यश्री सावंत, युवा कार्यकर्ते सचिन माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
देवराजदादा पाटील पुढे म्हणाले, स्व.जनार्दन काका पाटील,स्व.आनंदराव पाटील यांचे आपल्या परिसरात जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. मात्र ते आज आपल्यात नाहीत. त्यामुळे या मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी तुम्हाला आणि मला घ्यावी लागेल. आपण वाटेगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र,काळमवाडी येथील पिण्या च्या पाण्याची योजना,कासेगाव बाजार वाट तसेच या परिसरातील प्राथमिक शाळा,पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा,रस्ते,गटारी आदी प्रश्न मार्गी लावले आहेत. या मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांच्या विजयाबद्दल माझ्या मनात शंका नाही. मात्र आपले स्थानिक राजकारण बाजूला ठेवत जास्तीत -जास्त मताधिक्याने हे उमेदवार विजयी करण्यासाठी कामाला लागा.
सुस्मिता जाधव म्हणाल्या,लोकनेते राजारामबापू पाटील,आ.जयंतराव पाटील यांनी शेती व शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या भागाचे परिवर्तन घडवून आणले आहे. आमचे उमेदवार कमी बोलतील, मात्र संपर्क आणि विकास कामात कुठेही कमी पडणार नाहीत.
परिसरातील विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. यावेळी उमेदवार प्रकाश पाटील,केदारवाडीचे माजी उप सरपंच प्रशांत माने, काळम वाडीचे उपसरपंच स्वप्नील सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
काळमवाडी येथे सरपंच सविता सावंत,माजी सरपंच शिवाजी सावंत, हंबीरराव सावंत, प्रकाश सावंत, सदाशिव सुर्यवंशी, सुधीर सावंत, सुनिल देसाई, बापुसो देसाई, संतोष सावंत, शंकर चव्हाण, अजित सावंत, अधिक सुर्यवंशी, उत्तम चव्हाण, केदारगांवचे माजी संचालक हिंदुराव माने, सरपंच रत्नप्रभा माने,उपसरपंच जगन्नाथ पाटील, माजी चेअरमन पतंगराव कदम, माजी सरपंच शेखर थोरात, अमर थोरात, किरण माने, स्वाती कदम, विशाल माने, महेंद्र मोहिते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार उपास्थित होते.












































































